कराड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटून महाराष्ट्राला वाटत होते. आता त्यांचे नाव घेऊन राज्यात सत्तेत आलेले भाजप सरकार महाराष्ट्र लुटून सुरतेला वाटत आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपचा डाव असून भाजपच्या या कुटील राजकारणाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्पसंख्याक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्त विद्यमाने येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर झाला. या समारोपापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रेचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मार्गदर्शन केले. आमदार वजाहत मिर्झा, काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांच्यासह पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. जाहीर सभेस काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील, रणजित देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुरेश जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, रजनी पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील व केंद्रातील सरकार सत्तेवरून घालवण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन करून पटोले म्हणाले की, काँग्रेसला मानणाऱया मतांचे विभाजन झाले आहे. काँग्रेसला मतदान करण्याची मानसिकता वाढण्यासाठी कार्यकत्यांनी प्रयत्न करावेत. देशात 65 टक्के मते मोदींच्या विरोधात असून ती एकत्र आली तर भाजपचा पराभव अटळ आहे. काँग्रेसच्या विविध विभागांच्या वतीने काढण्यात आलेल्या संविधान बचाव पदयात्रेचे कौतुक करत कराडमध्ये सुरू झालेली ही संविधान बचाव यात्रा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात नेण्याची जबाबदारी आमची असल्याचे पटोले यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली असून मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर मतांची टक्केवारी 65 टक्के इतकी होते. लोकांनीही संविधान वाचवण्यासाठी यापुढे कटिबद्ध होणे आवश्यक आहे.
आमदार वजाहत मिर्झा, भानुदास माळी, ऍड. जाधव, झाकीर पठाण यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाचे वाचन करण्यात आले. संजय तडाखे, राहुल काळोखे यांनी स्वागत केले. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ पुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी नाना पटोले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले.