विरोधी पक्षांमधील घराणेशाही देशाला घातक ः भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला प्रारंभ
हैदराबाद / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक भर गरिबांच्या सबलीकरणावर आहे. त्यादृष्टीने केंद्रातील आणि विविध राज्यांमधील भाजप-रालोआ सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना आखल्या जात आहेत. विरोधी पक्ष मात्र, भाजप द्वेषापोटी या योजनांच्या क्रियान्वयनात अडथळे निर्माण करुन देशाची हानी करीत आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत येथे शनिवारी केले. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाचे बहुतेक सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत.
नड्डा यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यात त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि दिशा यावर प्रकाश टाकला. विरोधी पक्षांवरही त्यांनी सडकून टीका केली. विरोधकांचा एकमेव कार्यक्रम पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचा द्वेष करणे हाच असून केवळ याचपोटी ते केंद्र सरकारच्या देशहिताच्या योजनांनाही सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. भाजप-रालोआच्या आठ वर्षांच्या केंद्रीय सत्ताकाळात विरोधकांच्या नकारात्मक भूमिकेमधून देखील वाट काढत देशाची मोठी प्रगती घडविली गेली आहे. पंतप्रधान मोदी गेली 20 वर्षे उच्च पदांवर असून देशाच्या सेवेत मग्न आहेत. भाजपला कोणीही देशाच्या प्रगतीच्या मार्गावर रोखू शकणार नाही, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.
सुशासन हाच मंत्र
आमच्या सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये सुशासनाचा मंत्र आचरणात आणला आहे. त्यामुळे प्रशासकीय सुधारणा मोठय़ा प्रमाणात झाल्या आहेत. ‘गुड गव्हर्नन्स’ हा प्रशासनात परवलीचा शब्द बनला आहे, असे प्रतिपादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला सातत्याने विजयी आणि यशस्वी नेतृत्व दिल्याचेही जगतप्रकाश नड्डा यांनी सन्मानाने नमूद केले.
विकासवादाकडून परिवारवादाचा पराभव
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप-रालोआच्या कार्यकाळात विकासवादाकडून परिवारवादाचा सातत्याने पराभव होत आहे, असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष नड्डा यांनी केले. विरोधी पक्ष आपली सारी शक्ती केवळ त्यांना ताब्यात ठेवणाऱया विशिष्ट कुटुंबांसाठी खर्च करीत आहेत. या कुटुंबांची धन करणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांना देशाच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही, अशी टीका नड्डांनी केली.
चंद्रशेखर राव यांच्याकडून अपमान !
पंतप्रधान मोदी या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी तेलंगणात आल्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांचे स्वागत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून व्हावयास हवे होते. तथापि, राव यांनी हा शिष्टाचार पाळला नाही. यासंबंधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना विचारले असता, मुख्यमंत्री राव यांनी पंतप्रधान मोदी या व्यक्तीचाच केवळ नव्हे, तर या संस्थेचाही अवमान केला आहे. जनता त्यांना याचे उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही, असे उत्तर पत्रकार परिषदेत त्यांनी दिले.
मान्यवर पक्षनेते उपस्थित
ड भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला बव्हंशी मान्यवर नेते उपस्थित
ड पंतप्रधान नरेद्र मोदींचे कार्यकारिणीचा बैठकीत आज होणार भाषण
ड तेलंगणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शिष्टाचार मोडल्याची टीका
ड राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत आज रविवारी महत्वाचे ठराव येणार