ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशातील इतर सर्व पक्ष संपविण्यासंदर्भात केलेल्या विधानाने त्यांच्या पक्षाचा अजेंडाच स्पष्ट होत आहे. भाजपाची ही भूमिका देशाला हुकूमशाहीकडे नेणारी असल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
देशातील शिवसेनेसारखा पक्ष संपण्याच्या मार्गावर असून, इतर पक्षही संपतील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्यावर शरसंधान साधले. भाजपला इतर पक्ष नको आहेत. ही भूमिका म्हणजे लोकशाही ऐवजी हुकूमशाहीचा पुरस्कार करणारी म्हणता येईल. जनतेत जाऊन आपला पक्ष वाढवण्याचा मार्ग खुला असताना लोकशाहीविरोधी मार्गातून भाजपा प्रादेशिक पक्षांना संपवू पाहत आहे. प्रादेशिक आस्मिता चिरडण्याचे काम सुरू आहे. हिंदुंमध्ये फूट पाडली जात आहे, हे सारे राजकारण घृणास्पद आहे.
नड्डा यांचं वक्तव्य निघृण आणि घृणास्पद आहे. भाजपचा वंश कुठून सुरू झाला, हे ठरवावं लागेल. विरोधात बोलणाऱ्याला वाट्टेल ते करून अडकवतात. देश कुठे चालला आहे हे डोळे उघडून बघा. जे तिकडे गेले त्यांचा सत्तेचा फेस उतरला तर ते काय आहेत, हे लोकांसमोर येईल. दिवस फिरला की काय होईल, याचा विचार करा. संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. काही दिवसांपूर्वीच मी भांडुपमध्ये राऊत कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. राऊतांचा गुन्हा काय आहे? विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद करण्याचं हे कुटील राजकारण आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला
हेही वाचा : GST संकलनात 28 टक्क्यांची वाढ; जुलैमध्ये तिजोरीत 1.49 लाख कोटी