प्रतिनिधी /पर्वरी
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीयांवर आणिबाणी लादली होती. आणीबाणी फक्त एकवीस महिने होती, पण स्वतंत्र भारताच्या इतिहासात सदैव तिचा उल्लेख ‘एक काळे पान’म्हणूनच होत राहील. घटनेची मोडतोड, न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप, अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी आणि कुटुंब नियोजनातील अत्याचार या चार मुद्दय़ांवर अधोरेखित होत राहील, असे उद्गार दत्ता नाईक यांनी काढले.
येथील कदंबा हॉटेलच्या सभागृहात उत्तर गोवा भारतीय जनता पक्षातर्फे 47 वर्षांपूर्वी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत देशात लादलेल्या आणिबाणीच्या आठवणीत ‘काळा दिवस’चा निषेध करण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी सभापती उल्हास अस्नोडकर, गुरुप्रसाद पावसकर, किशोर अस्नोडकर, अशोक शेटय़े आदी उपस्थितीत होते.
आपण लोकतंत्र सेनानी म्हणून 1975 साली वावरलो. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी हुकूमशही पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याने सर्व थरातून निषेध व्यक्त केला जात होता. मिसा कायद्याचा वापर करून नागरिकांचा छळवाद केला जात असे. काँग्रेस पक्षाने आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये म्हणून आणीबाणी लागू केली. वृत्तपत्राची गळचेपी केली, विरोधी पक्षनेत्यांना अटक करणे, अत्याचार झालेल्या नेत्यांचे वैद्यकीय अहवाल लपविणे. निषेध करण्यासाठी तुरुंग कमी पडू लागले. शेवटी नेत्यांचे खून होऊ लागले, असे नाईक यांनी पुढे सांगितले.
आणीबाणी या काळय़ा दिवसाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी हा दिवस देशभर निषेध दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. तसेच सत्तेचा दुरुपयोग केला तर जनता माफ करीत नाही. सत्ता हातातून जाऊ शकते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आणीबाणी होय. असे उद्गार प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी काढले.
सुरवातीला किशोर अस्नोडकर यांनी ओळख करून दिली. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. अनुज हरमलकर यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक शेटय़े यांनी आभार मानले.