अष्टमीच्या फेरीवरून काँग्रेसची मनपावर टीका : उडालेल्या गोंधळास मनपाच जबाबदार
प्रतिनिधी /पणजी
पणजीत अष्टमीच्या फेरीचा बाजार भरण्यापूर्वीच अर्जांचा काळाबाजार करून मनपाने लाखोंचा गल्ला भरला असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला असून अर्ज वितरणाच्या नावाखाली दोन दिवस मनपाच्या दारात जो गोंधळ उडाला त्याला सर्वस्वी मनपाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
बुधवारी पणजीत आयोजित या पत्रकार परिषदेला एल्वीस गोम्स, पणजी महिला गटाच्या अध्यक्ष ऍड. लविनिया डिकॉस्टा, महेश म्हांबरे आदींचा उपस्थिती होती. गेल्या कित्येक वर्षांपासून पणजीत अष्टमीची फेरी आयोजित करण्यात येते. परंतु यंदा तेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मनपाने जो गोंधळ निर्माण केला त्यातून अनेकांच्या मनात मनपा आणि एकुणच भाजप सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल संतप्त भावना निर्माण झाली आहे, असे गोम्स पुढे म्हणाले. अर्जांच्या वितरणावेळी मनपाच्या प्रवेशद्वारावर झालेली गर्दी आणि त्यातून पोलिसांकडून झालेला लाठीमार या सर्व प्रकारास मनपाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
पणजीतील फेरी अगदीच किरकोळ
यापूर्वी आपण वास्को पालिकेत मुख्याधिकारी असताना तेथील सप्ताहासाठी अत्यंत नियोजितरित्या फेरीवाल्यांना जागांचे वाटप केले होते. त्या मानाने पणजीतील फेरी अगदी किरकोळ आहे. तरीही मनपाला ती नियोजित पद्धतीने करता येत नाही हे दुर्दैवी आहे. खरे तर अर्जांचे वाटप करण्यासाठी मनपाच्या दारात नव्हे तर विक्रेत्यांना फेरीच्या ठिकाणीच अर्ज वितरणाची व्यवस्था करायला हवी होती. परंतु मनपाच्या अधिकाऱयांना या अर्जविक्रीतून काळाबाजार करायचा होता. म्हणुनच एकुण 408 मधील केवळ 50 अर्जांची विक्री करण्यात आली, असा दावा गोम्स यांनी केला. उर्वरित अर्ज कुठे गेले याचा शोध प्रत्येकाने घ्यावा, असे ते म्हणाले.
मनपा आयुक्तांचे कानावर हात
अष्टमीच्या फेरीचे अर्ज नेण्यासाठी बुधवारी दुसऱया दिवशीही मनपाच्या दारात विक्रेत्यांनी गर्दी केली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यासंबंधी पत्रकारांनी मनपा आयुक्त आग्नेल फर्नांडीस यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. सदर फेरी आणि अर्ज वितरण यांच्याशी आपला काहीच संबंध नाही असे सांगून ते कार्यालयातून निघून गेले.
सर्वांनाच अर्ज देणे मुश्किल : बेन्तो लॉरेन्स
पत्रकारांनी मनपा मार्केट समितीचे अध्यक्ष बेन्तो लॉरेन्स यांची भेट घेतली असता अष्टमीची फेरी ही केवळ लाकडी वस्तू आणि फर्निचर यांच्याशी संबंधित असते. तरीही गैरसमजुतीतून विक्रेत्यांनी अर्ज मिळविण्यासाठी गर्दी केली. यातील बहुतेक विक्रेते हे वास्कोतील सप्ताहाची फेरी संपवून येथे आले होते. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना अर्ज देणे अशक्य होते. आम्ही पणजीतील स्थानिक विक्रेत्यांना अर्ज देऊ शकलो नाही. त्यामुळे अनेक नगरसेवकांचीही नाराजी ओढवून घेतली आहे. अशावेळी बाहेरील विक्रेत्यांना अर्ज मिळणे मुश्किल होते, असे ते म्हणाले. यावेळी मार्केट समितीचे माजी अध्यक्ष प्रमेय माईणकर यांचीही उपस्थिती होती.