जिह्यातील दुर्गम शाळा ‘सुगम’च्या यादीत
कोल्हापूर/कृष्णात चौगले
प्राथमिक शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे जिह्यातील ‘दुर्गम’ शाळांची नोंद ‘सुगम’च्या यादीत झाली आहे. गटशिक्षणाधिकारी ‘ऑन फिल्ड’ नसल्यामुळे हा सावळा गोंधळ झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागणाऱया गावांचा ‘दुर्गम’च्या यादीत समावेश नाही. ज्या गावात शालेय पोषण आहाराची गाडी जाते ती ‘सुगम’ आणि जेथे गाडी पोहोचू शकत नाही अशी गावे दुर्गम अशा सोप्या निषकांवर ही यादी तयार केली आहे. पण वर्षानुवर्षे पायी प्रवास सुरु असणाऱया शाळा शिक्षण विभागाच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱयांना दिसली नसल्यामुळे त्यांची नोंद ‘सुगम’च्या यादीत झाली आहे. त्यामुळे शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये अशा दुर्गम शाळांत अनेक वर्षे काम केलेल्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी या यादीवर आक्षेप नोंदवला आहे.
शासनाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी शिक्षकांच्या बदलीचा सुगम-दुर्गमचा नवा अद्यादेश काढला. यामध्ये सुगम व दुर्गम शाळा हे दोन निकष ठरविण्यात आले. सुगम म्हणजे दळणवळणाची साधने पोहोचतात अशी गावे तर दळणवळणाची साधने पोहोचत नाहीत अशा शाळांचा दुर्गम भागात समावेश करण्यात आला. या शासन निर्णयाप्रमाणे दुर्गम भागामध्ये तीन वर्षे काम केलेला शिक्षक सुगम शाळेमध्ये बदलीसाठी पात्र ठरतो. तर सुगम भागात नोकरी केलेल्या शिक्षकांची दुर्गम भागामध्ये बदली केली जाते. पण सुगम आणि दुर्गमच्या यादीतच घोळ असल्यामुळे शिक्षक बदली प्रक्रिया देखील गोंधळाची ठरणार आहे.
दुर्गम गाव निश्चित करण्यासाठी शासनाचे सात निकष आहेत. यामध्ये नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव, वार्षिक सरासरी 2 हजार मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान असणारे किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव (महसूल विभागाकडील माहितीनुसार), हिंस्त्र व वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश, वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूकीस योग्य रस्तांचा अभाव, किंवा रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक), संवाद छायेचा (मोबाईल नेटवर्क नसलेला) प्रदेश, डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार), राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त दूर असणारी गावे दुर्गम म्हणून निश्चित करावीत असा शासन निर्णय आहे. शिक्षण विभागाने या निकषांनुसार दुर्गमची यादी बनवली असली तरी वास्तविकतेमध्ये दुर्गम असणाऱया अनेक शाळा सुगमच्या यादीत आहेत.
आजरा तालुक्यात एकच गाव दुर्गम
जिह्यातील अनेक दुर्गम तालुक्यांपैकी आजरा हा एक तालुका आहे. या तालुक्यातील डोंगरदऱयात अनेक वाडय़ावस्त्या आहेत. मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर पायपीट केल्याशिवाय या ठिकाणी पोहोचता येत नाही. पण शिक्षण विभागाने या तालुक्यातील एकच शाळा दुर्गम म्हणून निश्चित केली आहे. पण शालेय पोषण आहाराचे तांदूळ डोक्यावरून घेऊन जावे लागणाऱया शाळा सुगम म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे अशा शाळांत वर्षानुवर्षे काम करणाऱया शिक्षकांकडून ‘शिक्षण’च्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अन्य तालुक्यातही अशीच परिस्थिती पहावयास मिळते.
गटशिक्षणाधिकाऱयांना कार्यालयातून बाहेर पडायला सांगा
शिक्षणाधिकाऱयांनी कार्यालयाबाहेर न पडताच दुर्गम शाळांची यादी तयार केली आहे. त्यामुळे दुर्गम वाडय़ा-वस्त्यांमधील शाळा त्यांना दिसलेल्या नाहीत. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱयांना तालुक्यातून दौरा करायला सांगा, म्हणजे त्यांना वस्तुस्थितीची जाणिव होईल, अशा सक्त सुचना जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना दिल्या.
प्राथमिक शिक्षक संघाचा दुर्गमच्या यादीवर आक्षेप
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या दुर्गम शाळांच्या यादीवर आक्षेप घेतला. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासक संजयसिंह चव्हाण यांना देऊन योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली. त्याची दखल घेऊन पुन्हा दुर्गम शाळांची यादी तयार करणार असून सध्या बदलीसाठी जुनी यादी गृहित धरणार असल्याचे प्रशासक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जिह्यातील दुर्गम शाळांची संख्या
तालुका दुर्गम शाळा संख्या
भुदरगड 14
चंदगड 16
गगनबावडा 15
करवीर 03
पन्हाळा 14
राधानगरी 44
शाहूवाडी 20
आजरा 01
एकूण 157