आरपीडी रोडवर आयएमईआरसमोर मोठय़ा प्रमाणात पाणी वाया
प्रतिनिधी / बेळगाव
पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन केले जाते. मात्र एलऍण्डटी कंपनीकडून पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे आढळून आले आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबविली जाते. मात्र पाणी गळतीकडे डोळय़ावर पट्टी बांधल्याप्रमाणे एलऍण्डटीचे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरपीडी रोडवर आयएमईआरसमोर लागलेल्या गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात
आहे.
गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी गळती लागली असून दुभाजकाच्या मध्यभागी असलेल्या जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीद्वारे जुने बेळगाव, वडगाव, आनंदनगर, यरमाळ रोड अशा विविध परिसरात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलवाहिनीद्वारे चोवीस तास पाणी वाया जात आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पण यामुळे दररोज हजारो लिटर पाणी गटारीमधून वाहत आहे. काही ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना याठिकाणी गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या पण याची दखल घेण्यात आली नाही.
दुर्लक्षाबद्दल अधिकाऱयांकडून दंड वसूल करा
काँक्रीटच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. सतत पाणी वाहून रस्त्याच्या काही भागावर शेवाळ निर्माण झाले आहे. परिणामी दुचाकी वाहनधारक घसरून पडत असल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याची दुरुस्ती करण्याकडे एलऍण्डटीच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले आहे. पाणीपट्टी वेळेत भरली नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. पण गळती निवारणाबाबत एलऍण्डटीच्या अधिकाऱयांनी डोळय़ावर पट्टी बांधली असल्याची टीका नागरिक करीत आहेत. पाणी शुद्धीकरण आणि पाणीपुरवठय़ाकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च होत असतो. याकरिता येणारा खर्च नागरिकांच्या करातून वसूल केला जातो. त्यामुळे अधिकाऱयांना याचे कोणतेच सोयरसुतक नाही. दुर्लक्ष केल्याबद्दल अधिकाऱयांकडून दंड वसूल करावा, तसेच गळती निवारणासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.