राजर्षी शाहू महाराज आणि भावनगरचे भावसिंहजी महाराज यांच्यातील ऋणानुबंध शंभर वर्षांनीही कायम
कोल्हापूर /संजीव खाडे
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राजसत्तेचा वापर रयतेला न्याय देण्यासाठी, रयतेच्या विकासासाठी केला. रयतेचा उद्धार हेच त्यांचे जीवनकार्य होते. त्यांच्या एकूण राजसत्तेच्या कारकीर्दीकडे पाहिल्यास त्यांनी प्रत्येक क्षण जनहितासाठी उपयोगात आणल्याचे दिसते. राजर्षी शाहू महाराज कधीही विलासी जीवन जगले नाहीत. प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर लोकांशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्याकडून जे शिकायला मिळेल ते घेऊन त्याचा वापर प्रभावी राज्यकारभार करण्यासाठी करण्यावर भर होता. त्यांनी असंख्य मित्र जोडले. त्यातील काही त्यांचे केवळ मित्र नव्हते तर मार्गदर्शक अर्थात गाईडही होते. मैत्रीच्या नात्यापलिकडे जावून बंधूपेम जपणाऱया शाहू महाराजांनी आपल्या मैत्रीचे प्रतिकच भाऊसिंगजी रोडच्या (भावसिंहजी महाराज) रूपाने आपल्या कोल्हापुरात जिवंत ठेवले आहे.
कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा (भवानी मंडप) ते नवीन राजवाडा (न्यू पॅलेस) हा संस्थानकाळापासून राजमार्ग (रॉयल स्ट्रीट) मानला जातो. या रस्त्याला राजर्षी शाहू महाराजांनी आपले परममित्र भावनगरचे महाराज भावसिंहजी यांचे नाव दिले. राजमार्गाचे नामकरण भावसिंहजी रोड होऊन शतक लोटले. कालौघात भावसिंहजी रोडचे भाऊसिंगजी रोड असे झाले. पण या नावाच्या इतिहासाला मैत्रीच्या अतुट धाग्याची किनार आहे.
भावनगरचे भावसिंहजी महाराज आणि शाहू महाराज हे दोघे परममित्र होते. दोघांनीही आपल्या हयातीत मैत्रीचा धागा अतुट ठेवला. शाहू महाराज राजकोट येथे शिक्षण घेत असताना त्यांची भावसिंहजी महाराज यांच्याशी मैत्री झाली. १८९६ मध्ये भावनगर संस्थानच्या गादीवर आल्यानंतर भावसिंहजी यांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारली. राजर्षी शाहू महाराज यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या संस्थानच्या काळात वैयक्तिक आणि कर्तव्यनिष्ठने लक्ष घाऊन प्रजाहिताचे निर्णय घेतले. संस्थानचा कारभार चालविताना हे दोघे एकमेकांशी सल्लामसलत करत असत. चर्चा करत असत. त्यातून असंख्य जनकल्याणाचे निर्णय कोल्हापूर आणि भावनगर संस्थानात घेतले गेले. राजर्षी शाहू महाराजांप्रमाणे भावसिंहजी महाराजही पुरोगामी विचाराचे होते. आपल्या संस्थानातील जनतेच्या शिक्षणावर त्यांनी शाहू महाराजांप्रमाणे लक्ष दिले. निर्णय घेतले. आर्थिक तरतुदी केल्या. त्यांनी कला, क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले. कवी, गायकांनाही त्यांना आश्रय दिला. ते स्वतः कवी होते. ‘बी. टी.’ या टोपण नावाने ते कविता लिहीत असत. त्यांच्या सर्वव्यापी कार्यामुळे भावनगर संस्थानचाही देशभर लौकिक झाला.
भावसिंहजी महाराजांवर शाहू महाराजांशी असणाऱया नाते, स्नेह आणि विचाराच्या देवाण घेवाणीचाही प्रभाव होता. अशा आपल्या परममित्राबरोबरच्या मैत्रीचा स्नेह शाहू महाराजांनी प्रभावीपणे जपला. जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाचे नामकरणच त्यांनी भावसिंहजी रोड असे केले. पुढे या रस्त्याचे नाव अपभ्रंश होऊन भाऊसिंगजी रोड म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही ही ओळख कायम आहे. १९२६ मध्ये भावसिंहजी महाराजांचे निधन झाले. तेंव्हा शाहू महाराजाना अतीव दुःख झाले होते. भावसिंहजी महाराज यांना तीन मुलगे, एक कन्या होती. आपल्या परममित्राच्या पश्चात त्याच्या (भावसिंहजी महाराज यांच्या) इच्छेप्रमाणे शाहू महाराजांनी सर्व कर्तत्वे पूर्ण केली. त्यांच्या राजपरिवाराला कधीही अंतर दिले नाही. पुढे १९२२ मध्ये शाहू महाराजांचे निधन झाले. आज शंभर वर्षांनी दोन्ही परममित्र या भुतालावर नसले, तरी कोल्हापूरमध्ये या दोघांच्या मैत्रीचा अतुट धागा, स्नेहबंध आजही भाऊसिंगजी रोड नावाने जिवंत स्मारकाच्या रूपाने कायम आहे.