वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या उत्तर बंगालच्या दौऱयावर आहेत. अलीपुरद्वार जिल्हय़ात पोहोचल्यावर ममतांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भाजप आमच्या बंगालला विभागण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु आम्ही असे होऊ देणार नाही. प्रसंगी आम्हाला रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण आम्ही बंगालचे विभाजन करू देणार नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. केंद्र सरकार पश्चिम बंगालचे दोन राज्यांमध्ये विभाजन करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ममतांनी यापूर्वी अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्य़ातील पक्षकार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. मुख्यमंत्री ममतांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा पाहता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.