दुर्दे गुरुवार पासून होते बेपत्ता
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील अमृतवाडी येथील चिमूरडे बहीण व भाऊ बेपत्ता झालेले दोघांचे मृतदेह घाराजवळीलच शेजारील दुसऱ्या विहिरीत रविवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. त्यामूळे तीन- चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे. मयत सुलोचना आनंदा गवळी (वय ५) व इंद्रजित आनंदा गवळी (वय ३) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, चार दिवसापूर्वी म्हणजे गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी अमृतवाडी येथील दोन चिमुकले मुले अचानक बेपत्ता झाल्याने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच जत पोलीसांनी गावात सर्व ठिकाणी आणि परिसरात शोध सुरू केला होता. मात्र त्यांना हाती कांहीच लागले नाही. घराशेजारील शेततळ्यात व विहिरीतील पाणी उपसा करून ही हे दोघे बहीण भाऊ सापडले नाहीत. त्यानंतर मुलांचे वडील आनंदा गवळी यांनी जत पोलिसात त्यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार देखील दाखल केली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी गावात तळ ठोकून होते.
जत येथील द्राक्ष बागायतदार दिपक हत्ती यांच्या शेतात काम करण्यासाठी नाशिकहून एक जोडपे ठेवले होते. मजूर आनंदा गवळी हे आपल्या पत्नीसह येथे राहत होते. त्यांना चार मुले आहेत. दरम्यान, गुरुवारी गवळी यांची पत्नी आजारी असल्याने तिला खाजगी रूग्णालयात उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले होते.
पालक आनंदा गवळी हे चारही मुलांना घरीच ठेऊन पत्नीस दवाखान्यात घेऊन गेले होते. सायंकाळी आनंदा गवळी घरी आले. त्यावेळी त्यांना दोन मुले झोपली होती तर दोन मुले घरी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेऊन जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लहान मुले लांब जाऊ शकणार नाहीत, हा अंदाज घेऊन जवळच खेळत खेळत विहीर अथवा शेत तलावात मुले पडली असावीत, असा अंदाज घेऊन विहीर व शेत तलावातील पाणी उपसून काढण्यात आले. मात्र त्यात मुले सापडली नाहीत.
चार दिवस मुले सापडत नसल्याने सगळेच चक्रावून गेले होते. मात्र रविवारी या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. शेतमालक दिपक हत्ती यांच्या मळ्यालगत वापर नसलेल्या विहीरीत पडलेली आढळून आली.मुलाचे प्रेत फुगुन वर आले होते व मुलीचे प्रेत विहीरीत अडकले होते.
स्थानिक नागरिकांनी 15 फुट खोल पाण्यात जाऊन त्यांना शोधून वर काढण्यात यश मिळविले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय जत येथे पाठविले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. चार दिवस पोलीस अमृतवाडी गावात तळ ठोकून होते. चिमुकल्यांच्या मृत्युची बातमी समोर आल्यानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.