शाहूवाडी / प्रतिनिधी
पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यात बेपत्ता झालेल्या हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील राजेश बाबुराव पाटील या युवकाचा मृतदेह अखेर टेकोली बंधाऱ्या नजिक सापडला. तीन दिवसापूर्वी सदर युवक बेपत्ता झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लाटवडे येथील राजेश बाबुराव पाटील हे आपल्या मित्रांच्या समवेत पालेश्वर धरणाकडे फिरण्यासाठी आले होते. सोमवार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात ते बेपत्ता झाले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह जीव रक्षक यांच्या पथकाने त्यांचा शोध घेतला. मृतदेह शोधण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला होता. मात्र त्यातही यश आले नाही अखेर बुधवार 17 ऑगस्ट रोजी टेकोली बंधाऱ्या नजीक लाटवडे येथील स्थानिक युवक त्यांच्यासह जीव रक्षक दिनकर कांबळे यांच्या पथकास सदरचा मृतदेह आढळून आला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.