खासदार श्रीनिवास पाटील, ग्रंथ महोत्सवाचा शानदार समारोप
प्रतिनिधी/ सातारा
आपल्या साधूसंतांनी महापुरुषांनी ग्रंथांची महती सांगितली आहे. ग्रंथ वाचले पाहिजेत, ग्रंथसंपदा ही जगण्याची भाकरी देतात. ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये जगण्याचे कला आहे. ज्ञान घेतल्याने वाढते, ते ग्रंथामधून मिळते. शिक्षण कधीही वाया जात नाही. आचार विचाराने समृध्दता येते ही समृध्दी ग्रंथ देतात. मराठी साहित्यात अनेक प्रतिभावंत लेखक आणि कवी जन्माला आले. साहित्य माणसाला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन देते हा महत्त्वाचा घटक आहे, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा ग्रंथ महोत्सव समिती सातारा जिल्हा शिक्षण परिषद यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर शंकर सारडा नगरीत आयोजित 22 व्या ग्रंथ महोत्सव समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सोहळ्यामध्ये ग्रंथमहोत्सव समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, डॉ. संदीप श्रोत्री, साहेबराव होळ, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रय क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, वाचन संस्कृतीची नाळ ही वाचकांशी जोडलेली आहे. त्यामुळे जगण्याची प्रगल्भता ही ग्रंथ व्याख्यानांमधून येते आणि समाजाला उंची देणार ग्रंथ नेहमीच जगण्याचे भान देतात अशी सुसंस्कृत पिढी देशाला निकोप समाजाच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरते. आचार विचाराने समृध्दता येते ही समृध्दी ग्रंथ देतात. मराठी साहित्यात अनेक प्रतिभावंत लेखक आणि कवी जन्माला आले. साहित्य माणसाला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन देते हा महत्त्वाचा घटक आहे. त्याला दिशा देण्यासाठी वेळोवेळी होणे आवश्यक आहे. जगण्याचे साहित्य शब्दांच्या रुपाने वाचकांपर्यंत पोहोचले तर त्यामधून जगण्याचे भान समृद्ध होते. साताऱयाचा ग्रंथमहोत्सव आता प्रगल्भ झाला असून महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीला त्यांनी वेगळे दिशा दिली आहे. ग्रंथ महोत्सवात येणाऱया प्रकाशकांनी प्रकाशित पुस्तके विकावीत आणि सातारकरांनी ती विकत घ्यावीत हे दृश्य मनोहारी आहे. गेल्या दोन दशकाच्या वाटचालीत अनेक प्रयोग अनेक नामवंत कवी, लेखक, व्याख्याते, कलाकार या व्यासपीठावर हजेरी लावून सातायाच्या वाचन व्यासंगाचा पॅटर्न हा सर्वदूर पोहोचला आहे.
लेखक व विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या मनोगताची दृकश्राव्य फीत दाखवण्यात आली. साळुंखे म्हणाले, सातारा ग्रंथ महोत्सवाचा उल्लेख राज्याच्या सांस्कृतिक धोरणात झाला आहे. तांत्रिक साधने वाचनाची जागा घेऊ शकत नाही. परंतु जे वाचन आहे त्याची स्वीकार्यता बुध्दीच्या निकषावर आहे. मराठी भाषेच्या प्रसारासाठी वेळोवेळी ठिकठिकाणी ग्रंथमहोत्सव झाला पाहिजे. ग्रंथमहोत्सव समाज बळकटीकरणासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने झाली. महोत्सव समितीच्या वतीने श्रीनिवास पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिरीष चिटणीस यांनी प्रास्तविक केले. डॉ. यशवंत पाटणे यांनी ग्रंथ महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले.
लाखो रुपयांची उलाढाल साताऱयाच्या ग्रंथमहोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सध्या सोशल मीडियावरुन झाल्याने जिह्याच्या कानाकोपऱयातून वाचकांनी भेटी दिल्या. आलेल्या वाचकांनी किमान एकतरी पुस्तकं विकत घेतले असून त्यामुळे प्रत्येक स्टॉल्सवर लाखो रुपयांची उलाढाल झालेली असून कोटय़वधी रुपयांचे आर्थिक गणिते या महोत्सवात झाल्याचे सांगण्यात येते.