नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस मोफत मिळणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. 15 जुलैपासून सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये बुस्टर किंवा खबरदारीचा डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे. तथापि, मोफत डोस पुढील 75 दिवसांसाठीच उपलब्ध असेल. सध्या देशात कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस मोफत दिला जातो, तर बूस्टर डोससाठी पैसे मोजावे लागत आहेत.
भारत पुढील महिन्यात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा महोत्सव साजरा करत आहे. या औचित्याने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा सर्व सरकारी केंद्रांवर उपलब्ध असेल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले. देशात नव्याने वाढणाऱया कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवून कोविड लसींचे मोफत डोस उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे डोस मोफत दिले जाणार आहेत.
गेल्या आठवडय़ातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱया सावधगिरीच्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. म्हणजेच दुसऱया इंजेक्शननंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेता येतो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लसीकरणाला गती देण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘हर घर दस्तक अभियान’ सुरू केली होती. ही दोन महिन्यांची मोहीम आता सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 96 टक्के लोकसंख्येला कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 87 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
आतापर्यंत 1 टक्क्मयांहून कमी लाभार्थींना बुस्टर
देशात 18 ते 59 वयोगटातील 77 कोटी लोकांना बुस्टर म्हणजेच खबरदारीचा डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 1 टक्क्यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 16 कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि प्रंटलाईन कर्मचाऱयांना बुस्टर डोस मिळाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सहा महिन्यांनी अँटिबॉडीजची पातळी होते कमी
देशातील बहुतांश लोकांना सुमारे नऊ महिन्यांपूर्वी कोविड लसीचा दुसरा डोस मिळाला होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरिरातील प्रतिपिंडाची म्हणजेच अँटिबॉडीजची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होते. अशा परिस्थितीत बूस्टर किंवा सावधगिरीचा डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे सरकारने 75 दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रांवर मोफत खबरदारीचे डोस दिले जातील.
नव्या रुग्णांमध्ये होतेय वाढ
मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर देशात कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी 16,107 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. हे मागील दिवसाच्या तुलनेत 5,392 अधिक आहे. यादरम्यान मृतांचा आकडाही 17 वरून 45 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 589 आहे. सद्यास्थितीत देशभरात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत येथे 2,659 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. येथे 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.