डब्ल्यूएमसीसी बैठक आयोजित ः एलएसीवरील स्थितीची समीक्षा
वृत्तसंस्था / बीजिंग
भारत-चीना सीमा विषयक सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्ययंत्रणेची (डब्ल्यूएमसीसी) 26 वी बैठक बुधवारी बीजिंगमध्ये आयोजित झाली. जुलै 2019 नंतर दोन्ही देशांदरम्यान डब्ल्यूएमसीसीची पहिली प्रत्यक्ष बैठक होती. या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेश मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी (पूर्व आशिया) केले. तर चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व त्याच्या विदेश मंत्रालयाच्या सीमा आणि समुद्रविषयक विभागाच्या महासंचालकांनी केले आहे.
या बैठकीत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी भारत-चीन सीमावर्ती क्षेत्रांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) स्थितीची समीक्षा केली आणि उर्वरित भागातून माघारीच्या प्रस्तावांवर चर्चा केली आहे. पश्चिम सेक्टरमध्ये एलएसीवर शांतता प्रस्थापित करणे आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये सामान्य स्थिती बहाल करण्याच्या उद्देशाने यावेळी चर्चा करण्यात आली.
अस्तित्वात असलेले द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारांनुसार दोन्ही देश लवकरात लवकर वरिष्ठ कमांडर्सची 18 व्या फेरीतील बैठक आयोजित करण्यावर सहमत झाले. स्वतःचा उद्देश प्राप्त करण्यासाठी सैन्य आणि राजनयिक माध्यमातून चर्चा सुरू ठेवण्यावरही सहमती झाली आहे.
डब्ल्यूएमसीसीची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली होती. याचा उद्देश सीमाविषयक भारत आणि चीनदरम्यान सल्लामसलत तसेच समन्वयासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे. दोन्ही देशांदरम्यान गलवान खोऱयात हिंसक झटापट झाल्यापासून तणाव असताना 26 वी बैठक झाल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.