शिनोळी कोल्हापूर
सीमा बांधवांना तक्रार नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी आज मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. आज चंदगड तालुक्यातील शिंदोडी गावातील ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी आलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरच ही कैफियत एकीकरण समितीच्या सदस्यांनी मांडली यावेळी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील समनव्यक मंत्री शंभूराज देसाई हे आज चंदगड तालुक्यातील शिनोळी प्रचारासाठी आले होते. त्यादरम्यान, सीमा भागातील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नागरिकांनी मंत्री शंभूराज यांच्या समोरच घोषणाबाजी केली. बेळगाव, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यावेळी सीमा भागातील मराठी बांधवांचे अधिकार संपवण्याचा घाट कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. सीमा भागातील नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी संकेतस्थळ तयार करावे अशी मागणी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र सरकार सीमा भागातील नागरिकांसाठी नेहमीच छातीची ढाल करेल. सीमा भागातील नागरिकांना तक्रार नोंदवण्यात साठी लवकरच संकेतस्थळ तयार करून त्यावर विशेष लक्ष दिले जाईल. तसेच सीमा भागातील 890 गावांबाबत योग्य सकारात्मक चर्चा अधिवेशन संपल्यानंतर केली जाईल. तसेच अधिवेशन संपल्यानंतर सीमा बांधवांशी प्रत्यक्ष भेटून योग्य ती चर्चा करून कर्नाटक सरकारची संगनमताने प्रश्न सोडवू, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.