नेपाळच्या हद्दीतून दगडकेफ ः निर्मितीकार्यात आणले अडथळे
@ वृत्तसंस्था / देहरादून
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये भारत-नेपाळ सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी नेपाळच्या दिशेकडून भारतीयांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे निर्मितीकार्यात सामील मजुरांमध्ये गोंधळ निर्माण झाला. धारचूला क्षेत्रात ही दगडफेक झाली असून तेथे काली नदीच्या काठावर भिंत बांधण्याचे काम सुरू होते. या निर्मितीकार्याला नेपाळचे नागरिक विरोध करत आहेत. तर या दगडफेकीवेळी नेपाळचे सुरक्षा जवान मूकदर्शक राहिल्याचे समोर आले आहे.
नदीच्या काठावर सुरक्षा भिंत बांधताना नेपाळच्या दिशेकडून अनेकदा दगडफेक करण्यात आली आहे. धारचूलामध्ये काली नदीच्या पात्रामुळे काठाची धूप होत असल्याने ही सुरक्षाभिंत बांधण्यात येत आहे. बांधकाम कंपनीचे मजूर रविवारी या निर्मितीकार्यात सामील असताना नेपाळमधून काही लोकांनी दगडफेक सुरू केली. यामुळे अफरा-तफरीची स्थिती निर्माण झाली.
भारत स्वतःच्या हद्दीत सुरक्षाभिंतीची निर्मिती करत आहे, तरीही नेपाळकडून सातत्याने आक्षेप व्यक्त करण्यासह काही समाजकंटक दगडफेक करत आहेत. यापूर्वीही नेपाळमधून या ठिकाणी दगडफेक करण्यात आली आहे. यासंबंधी भारतीय क्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे.
काली नदी वाद
भारताकडून नदीकाठावर सुरक्षाभिंत बांधण्यात आल्याने आपल्या दिशेने जमिनीची धूप होणार असल्याचे नेपाळच्या नागरिकांचे मानणे आहे. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण आपत्तीमुळे मोठय़ा प्रमाणात काली नदीतील गाळ घटखोलामध्ये साचला आहे. गाळ साचल्याने सुरक्षाभिंतीच्या निर्मितीकार्यात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच धारचूलाचे प्रशासकीय अधिकारी दिवेश शासनी आणि सिंचन विभागाच्या अभियंत्याने (इंजिनियर) नेपाळमध्ये पोहोचून दार्चुला जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांशी चर्चा केली होती. 10-15 दिवसांमध्येच पुन्हा दोन्ही देशांच्या अधिकाऱयांदरम्यान बैठक होणार आहे.