महिला क्रिकेटमध्ये 23 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता, 1328 धावा व 84 बळींचे योगदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची सीम गोलंदाजी अष्टपैलू रुमेली धर हिने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 38 वर्षीय रुमेली हिने 2018 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारत-ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात महिला तिरंगी टी-20 मालिकेत त्यावेळी रुमेलीने संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
‘पश्चिम बंगालमधील श्यामनगरमधून सुरुवात झालेल्या माझ्या 23 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीची येथे सांगता होते आहे. या प्रदीर्घ वाटचालीत मी अनेक चढउतार अनुभवले. 2005 वर्ल्डकपमधील फायनल खेळण्याची संधी लाभली, तो माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण होता. याशिवाय, भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे हा सन्मान ठरला. कारकिर्दीदरम्यान काही दुखापतींचा मला फटका बसला. पण, प्रत्येक वेळी मी ताकदीने पुनरागमन करु शकले’, असे रुमेली धर हिने इन्स्टाग्रामवर नमूद केले.
‘आज निवृत्तीची घोषणा करताना अर्थातच भावूक होणे साहजिक आहे. सर्व कुटुंबिय, बीसीसीआय, मित्रपरिवार, बंगाल, रेल्वे, एअर इंडिया, दिल्ली, राजस्थान, आसामसह भारतीय क्रिकेट संघातील सर्व सहकारी, सदस्य यांची मी मनापासून आभारी आहे. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून मला संधी दिली. त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी विविध माध्यमातून मी या खेळाशी संलग्न असेन’, असे धर याप्रसंगी म्हणाली.
आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत रुमेली धर हिने 4 कसोटी, 78 वनडे व 18 टी-20 सामने खेळले आणि सर्व क्रिकेट प्रकारात 1328 धावा व 84 बळी नोंदवले. दक्षिण आफ्रिकेत संपन्न झालेल्या 2005 वर्ल्डकप फायनलमध्ये ती भारतीय संघात समाविष्ट होती. त्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 98 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय, रुमेली इंग्लंडमधील 2009 टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत संयुक्त आघाडीवर राहिली. त्यावेळी तिने 4 सामन्यात 4.98 च्या इकॉनॉमीने 6 बळी घेतले.
2003 मध्ये लिंकन येथे इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया रुमेलीने वयाच्या 34 व्या वर्षी भारतीय संघात केलेले पुनरागमन सर्वाधिक आश्चर्यकारक मानले गेले. त्यावेळी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकन दौऱयासाठी तिचा भारतीय टी-20 संघात समावेश केला गेला होता.