प्रेयसीच्या खूनाचा गुन्हा प्रेमवीरावर दाखल ; गिरोली घाट आत्महत्या प्रकरण, नातेवाईकात शांतता
वारणानगर/प्रतिनिधी
प्रेयसीच्या नातेवाईकानी एक वर्षापूर्वी लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून प्रेयसी ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) हिचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून करुन आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, खून केल्याचा गुन्हा प्रेमवीर कैलास याच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाला असून उपचारादरम्यान कैलासचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, याबाबतची फिर्याद मुलीचे वडील प्रकाश विठ्ठल चोपडे रा. खोतवाडी यानी दिली आहे. तर बुधवार दि. २१ रोजी सकाळी ९ वा. प्रेमवीर कैलास याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने दोन्ही नातेवाईकात शांतता पसरली आहे.
गिरोली घाट ता. पन्हाळा येथील पांडवलेणी परिसरात मंगळवार दि. २० रोजी रात्री ८ वा.पूर्वी ऋतूजा प्रकाश चोपडे (वय २१) हिचा कैलास आनंदा पाटील (वय २९) मुलाने दोरीने गळा आवळून खून करून स्वत्ता आत्महत्या करण्यासाठी विषप्राशन केले होते. सकाळी गुडबाय व रात्री द एंड असा मेसेज नातेवाईकांना सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे नातेवाईकांना कळाले यानतंर दोघांची तातडीने शोधाशोध सुरू झाली होती.
कैलासचे वडील आनंदा पाटील यानी मुलाच्या शोधासाठी आपल्या पोलीस मित्राला कळवलेवर मोबाईल लोकेशन वरून गिरोली घाट येथे आलेवर कोडोली पोलीसांना घटनेची माहिती दिल्यावर तसेच पोहाळे येथील पोलीस पाटील यांचेकडून घटना स्थळाची खात्री झालेवर पोलीस फौजफाट्यासह तिकडे रवाना झाले. रात्री उशीरा पर्यंत पंचनाम्याचे काम सुरु होते.
हे ही वाचा : प्रेयसीचा खून करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
कैलास हा ऋतूजाच्या आईच्या मावशीया मुलगा होता त्यामुळे दोन्ही कुटूंबात चांगला स्नेह होता. तीन वर्षापूर्वी कैलासचा ऋतूजा बरोबर लग्न करण्यास नातेवाईक तयार होते. त्यावेळी कैलास कामधंदा करीत नव्हता त्यामुळे लग्नाचा विषय बाजूला पडला. एक वर्षापूर्वी ऋतूजाच्या पालकांनी या लग्नास दोघांच्या वयातील अतंर लक्षात घेवून लग्नास नकार दिला होता. कैलास सद्या खाजगी ठिकाणी नोकरी करीत होता. तर ऋतूजा मेडिकलचे शिक्षण घेत होती ती शिक्षणासाठी रहात असलेल्या ठिकाणावरून ती कैलास सोबत गिरोली घाटात पांडव लेणी येथे फिरायला गेलेवर तिथे लग्नावरून दोघात झालेल्या चर्चेतून जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा तथापी ऋतूजाचा खून करून स्वत्ता आत्महत्या करणे पर्याय निवडला असावा. पण हा पर्याय कोणालाच पटेनासा झाला आहे. कैलासवर खूनाचा गुन्हा नोंद झाला असलातरी त्याचा देखील मृत्यू झाला आहे. पण कैलासच्या नातेवाईकानी कोणतीच तक्रार दिलेली नाही.
अप्पर पोलीस अधिक्षक जयत्री गायकवाड, पोलीस उपअधिक्षक रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक एसं. ए. डोईजड तपास करीत आहेत.