अध्याय तिसावा
नाथमहाराज सांगू लागले, कृष्णमायेचा यादवांच्यावर जबरदस्त पगडा बसलेला असल्याने त्यांच्या मनात चांगले काय, वाईट काय कशाकशाचा विचार येत नव्हता. उलट आपण करतोय ते बरोबरच आहे ह्या विचाराने ते उन्मत्त होऊन एकमेकांना मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते आणि परस्परांचा जीव घेत होते. बाप म्हणू नका, चुलता म्हणू नका, कुणाकुणाची त्यांनी पर्वा केली नाही. कन्येच्या मुलाने निष्ठुरपणे आज्याचा घात केला. मामाभाचे परस्परात निकराची लढाई करू लागले. मित्रामित्रांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी घावही घातले. सगळे मुर्खासारखे आपापल्या ज्ञातीबांधवांचा घात करायला टपले होते. इतके घनघोर युद्ध सुरु झाले की, सगळ्यांच्या भात्यातले बाण संपले. त्यासरशी धनुष्याच्या दांड्यांनी ते एकमेकांच्यावर घाव घालू लागले. त्यामुळे ते दांडे तुटून गेले. धनुष्याप्रमाणे इतर हत्यारेही मोडकळीला आली. त्यांच्यातली तीक्ष्णता कमी झाली पण यादवांना त्याचे काय? त्यांच्या मानगुटीवर ब्रह्मपाशाचे भूत सवार झाले होते. त्या नादात त्यांनी कमकुवत झालेली शस्त्रs फेकून दिली आणि ते एकमेकांवर मुठीने प्रहार करू लागले. तेव्हढ्यात त्यांना समुद्र किनाऱ्यावर भाल्यासारखे गवत उगवलेले आढळले. ते तेथे कसे आले ह्यामागेही यादवांनी मस्तीत येऊन दुर्वास ऋषींची केलेली चेष्टा आणि त्यामुळे त्यांनी दिलेला शाप कारणीभूत होता. त्याचे असे झाले की, यादवांनी उन्मत्त होऊन दुर्वास ऋषींची चेष्टा करायच्या उद्देशाने सांबाला स्त्राrवेशात गरोदर मुलीप्रमाणे तयार करून हिला काय होईल असे विचारले. दुर्वास मुनींच्या लक्षात सर्व प्रकार आलेला होताच त्यांनी रागाने हिला मुसळ होईल असा शाप दिला. त्या शापानुसार सांबाच्या पोटात मुसळ निघाले. ते पाहून घाबरलेल्या यादवांनी त्या मुसळाचे तुकडे तुकडे करून त्या तुकड्यांचे चूर्ण करून समुद्रात फेकून दिले. ते तुकडे समुद्रात रुजले आणि त्याला गवत फुटले. त्या गवताला लोखंडासारखा कठीणपणा होता आणि टोकाला भाल्यासारखी तीक्ष्ण टोके होती. ते गवताचे भाले यादवांच्या आयतेच हातात आले. त्यांनी ते त्यांच्या बलदंड बाहूनी पेलले आणि गरगरा फिरवून एकमेकांना त्या भाल्यांनी हाणू लागले. आत्तापर्यंत अनेक शस्त्रांचे आघात होऊनही जे यादववीर जखमी झाले नव्हते ते ह्या भाल्यांच्या आघाताने अचेतन होऊन पडले. अशा अचेतन होऊन पडलेल्या यादववीरांच्या संख्येला गणती म्हणून उरली नाही. त्यातूनही जे महाशूर उरले ते झुंजार, निधड्या छातीचे होते. त्यांची समजूत घालावी म्हणून श्रीकृष्ण धावून आला. तो त्यांना म्हणाला, हे ब्रह्मपाशाचे गवताचे भाले हातात धरू नका. हे युद्ध आता थांबवा. मी सांगतोय ते ऐका. श्रीकृष्ण असे जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचवेळी त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले यादव त्याच्याच अंगावर धावून गेले. हे सर्व कृष्णमायेच्या प्रभावाने घडत होते. त्यामुळे मरणाला कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ते येणार होतेच. त्यातील एकजण म्हणाला आधी ह्या श्रीकृष्णालाच मारून टाका. हा आम्हालाच ठ्कवायला निघालाय. मोठा आलाय सांगणारा की, गवताचे भाले हातात धरू नका म्हणून. जर आम्ही हे भाले हात घेतले नाहीत तर इतर आम्हाला जिवंत तरी ठेवतील काय? आम्ही मरावे म्हणून हा आम्हाला असले सल्ले जाणूनबुजून देत आहे. दुसरा एकजण म्हणाला ह्याचे केस धरा आणि ह्याला चांगले बडवून काढा. तिसरा तर म्हणू लागला की कृष्ण कृष्ण तो काय मी ह्याला एका घावात लोळवीन. ह्याच्या पलीकडे उभा असलेला बलराम आणि हा, हेच आमचे मुख्य शत्रू आहेत. ह्या दोघांना आधी मारून टाकू. असे म्हणून आपल्या पालनपोषण करणाऱ्याला मारून टाकायला ते बिनदिक्कत तयार झाले.
क्रमश: