देसूर परिसरात नुकसानग्रस्तांना सरकारकडून भरपाई मिळवून देण्याची मागणी
वार्ताहर / धामणे
देसूर गाव बेळगाव तालुक्मयात वीट व्यवसायासाठी अग्रेसर असले तरी मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा वीट व्यवसायाची सुरुवात डिसेंबरपासून करण्यात आली. परंतु, सुरुवातीपासून अधूनमधून मोठय़ा प्रमाणात वळीव पाऊस पडल्याने कच्च्या विटा खराब होऊन या व्यवसायावर बराच परिणाम झाला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात प्रतिवर्षापेक्षा 15 दिवस अगोदर झाली असून अडचणीतील वीट भट्टीपर्यंत वाहने जात नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
देसूरमध्ये 80 टक्के लोक वीट व्यवसायात आहेत. विटा काढण्यासाठी बाहेरून मजूर मागवून कुटुंबासमवेत ते विटा काढतात. यंदा वळीव पावसाचे प्रमाण वाढल्याने या कामगारांना व्यवसायात चांगली कमाई झाली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. येथील वीट व्यावसायिकांना वळीव पावसामुळे आणि महागाईमुळे मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले.
महागाईमुळे विटा काढणाऱया कामगारांची मजुरी वाढली आहे. डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने वाहनांचे भाडे वाढले असून भट्टीला लागणाऱया लाकडाच्या किमतीतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. एका वीटभट्टीला दोन लाख रुपयांचे लाकूड वापरावे लागते. एका डंपरमधून आणलेल्या मातीत 3 हजार विटा तयार होतात. कच्च्या विटांच्या भट्टय़ा पावसामुळे मोठय़ा प्रमाणात खराब होऊन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने ते हवालदिल झाले
आहेत.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या व्यवसायात झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून शासनाकडून नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.