वाहनचालकांवर कोसळण्याचा धोका : स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यासाठी खांब उभारण्यात आले आहेत. मात्र एलईडी दिव्याऐवजी काही ठिकाणी जुनेच दिवे बसविण्यात आले होते. पण स्मार्ट सिटीतील कॉलेजरोड परिसरात डेकोरेटिव्ह खांबावरील दिवे मोडकळीस आले असून लोंबकळणाऱया स्थितीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना याचा धोका निर्माण झाला आहे.
राणी चन्नम्मा चौक ते संचयनी सर्कलपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकावर नवीन विद्युत खांब बसविण्यात आले. मात्र एलईडी दिवे बसविण्यासाठी निधी नसल्याने दिवे बसविण्यात आले नव्हते. संपूर्ण रस्ता अंधारात असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अंधारामुळे वाहनांचे अपघात होत असल्याने दिवे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने नवीन दिव्याऐवजी जुने दिवे बसविले होते. हे दिवे नटबोल्ट किंवा क्लिप लावून बसविणे आवश्यक होते. पण दोरी आणि वायरने बांधून जुने दिवे बसविण्यात आले होते. मात्र कॉलेजरोड परिसरातील खांबांवरील दिवे आता मोडकळीस आले असून, लोंबकळणाऱया स्थितीत आहेत. कोणत्याही क्षणी हे दिवे खाली पडण्याची शक्यता आहे.
अनर्थ घडण्याची शक्मयता
कॉलेजरोडवर वाहनचालकांची वर्दळ असते. परिणामी दुचाकी वाहनांवर कोसळल्यास अनर्थ घडण्याची शक्मयता आहे. स्मार्ट सिटीतील मोडकळीस आलेल्या दिव्यांमुळे अपघात होण्याचा संभव असल्याने या कामकाजाबद्दल संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे देखभाल कंत्राटदार, मनपा आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. दोरी आणि वायरच्या सहाय्याने लावलेले पथदीप कोसळण्याचा धोका असल्याने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.