वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी कर्णधार सविता पुनियाच्या भारतीय महिला हॉकी संघाने कास्यपदक मिळविले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये तब्बल 16 वर्षानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे हे पहिले पदक आहे. कास्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पहिले पदक मिळविण्यासाठी तब्बल 16 वर्षांची वाट पहावी लागली. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाने 59 मिनिटापर्यंत न्यूझीलंडवर एका गोलाची आघाडी राखली होती. पण न्यूझीलंडने सामना संपण्यास 30 सेकंद बाकी असताना पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना सलिमा टेटेने भारताचे खाते उघडले. त्यानंतर ओलिव्हिया मेरीने न्यूझीलंडचा गोल पेनल्टी कॉर्नरवर नांदविला.
निर्धारित वेळेत गोलकेंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतीय संघाची कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाने दर्जेदार गोलरक्षण करून न्यूझीलंडचे पेनल्टी शुटआऊटमधील तीन फटके अडविले. पेनल्टी शुटआऊटमध्ये मेगान हुलने न्यूझीलंडचा गोल नोंदविला. त्यानंतर गोलरक्षक सविता पुनियाने न्युझीलंडच्या रोज तेनान, केटी डोयेर आणि ऑलिविया शेनॉन यांचे फटके अडविले. पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतातर्फे सोनिका आणि नवनीत यांनी गोल नोंदवित न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले.
कास्यपदकासाठीच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर पहिल्या मिनिटापासूनच भर दिल्याने न्यूझीलंडच्या बचावफळीवर बरेच दडपण आले. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय गोलरक्षकाने तो थोपविला. 17 व्या मिनिटाला भारतीय संघातील संगिता कुमारीने न्यूझीलंडच्या गोलपोस्ट दिशेने मारलेली मुसंडी न्यूझीलंडच्या बचावफळीने थोपविली. मात्र 29 व्या मिनिटाला सलिमा टेटेने उजव्या बगलेतून चेंडूवर ताबा मिळवित न्यूझीलंडच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. सामन्यातील 35 व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या आघाडीफळीने आपल्या डावपेचात बदल करत भारतीय संघावर दडपण आणले होते पण त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा उठविता आला नाही. 43 व्या मिनिटाला न्यूझीलंडने भारताशी बरोबरी करण्याची संधी गमविली. न्यूझीलंड संघातील मेरीचा हा गोल पंचांनी नियमबाहय़ ठरविला. 52 व्या मिनिटाला भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण गुरुजित कौरला न्यूझीलंडच्या गोलरक्षकाला हुलकावणी देता आली नाही. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना भारतीय संघातील लालरेमीसियामीला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने उर्वरित कालावधीत भारताला 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. या संदीचा फायदा घेत न्यूझीलंडने पेनल्टी कॉर्नर मिळविला. भारताच्या नवनीतने न्यूझीलंडच्या मेरीने गोलपोस्टच्या दिशेने पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका अडविल्याने न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक पंचांनी बहाल केला आणि मेरीने गोल नोंदवून निर्धारित वेळेत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.