महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. शिंदे फडणवीस सरकार संत्तेत आल्यापसून या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने सर्वांचे याकडे लक्ष होते. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक लोकप्रीय घोषणा केल्यानंतर आता राजकिय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प केवळ ‘गाजर का हलवा’ अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.
विधीमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे मम्हणाले, “महाविकास आघाडीच्या सरकारने दोन- तीन अर्थसंकल्प मांडले. त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती. कोरानाचे महाराष्ट्रावर संकट होते. केंद्र सरकार आमच्या बाजूचे नव्हते. जवळजवळ 25 हजार कोटीपेक्षा जास्त जीएसटीची थकबाकी केंद्राकडून थांबवली गेली होती.”
“त्याच महाशक्तीचा पाठींबा लाभलेले 6 महीन्यापुर्वी स्थापन झालेले सरकार कशा प्रकारे अंदाधूद कारभार करत आहे हे सर्व जण पाहत आहेत. आजच मी दोन शेतकऱ्यांशी बोललो, अद्यापही शासनाचा एकही माणूस अवकाळीमुळे नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पोहोचला नाही” असे ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले, “हा अर्थसंकल्प फक्त एक गडगडाट आहे. या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना मधाचे बोट लावण्याचा प्रकार झाला आहे. याला गाजर हलवा अर्थसंकल्प असे नाव योग्य आहे.” असे सांगताना “या सरकारने महाविकास आघाडीच्याच योजना नविन नावाने चालवल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना आम्ही सुरु केली. पण या सरकारने ती आता राबवली आहे ज्या घोषणा झाल्या आहेत त्या आता प्रत्यक्षात कधी येतील हासुध्दा एक प्रश्न आहे.” असे ते म्हणाले.
आपल्या प्रतिक्रियेमध्ये शेवटी त्यांनी “शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हजार टाकले असले तरी त्याच्या मालाला योग्य भाव मिळेल याची कोणतीही हमी नाही. विधानपरिषदेत दिपक केसरकर यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला गेला. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन दिले होते. पण 8 ते 9 वर्ष झाली तरी त्याचा पत्ता नाही.” असे ते म्हणाले.