एस. वाय. प्रभू यांचे प्रतिपादन ; समर्थ अर्बन सहकारी सोसायटीतर्फे गुणवंतांचा गौरव
प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या मुलांना कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी पालकांनी त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. आज विद्यार्थी हे संगणक व मोबाईल यांना खिळून बसत आहेत. त्यांना मैदानाकडे नेऊन मनसोक्त खेळण्यास दिले पाहिजे. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागून ते यशस्वी होतील, असे विचार एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू यांनी व्यक्त केले.
समर्थ अर्बन सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अनगोळ रोड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी समर्थ सोसायटीचे उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी होते. व्यासपीठावर सर्व संचालक मंडळ होते. सोसायटीने नुकतेच 26 व्या वर्षात पदार्पण केले असून मागील 25 वर्षांपासून संस्थेतील सभासदांच्या गुणवंत मुलांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येत आहे. यावषी पहिली ते पदवीपर्यंतच्या गुणवंत मुलांना गौरविण्यात आले.
प्रा. एस. वाय. प्रभू म्हणाले, सध्याच्या पिढीतील मुले अतिशय हुशार व जबाबदारीची जाणीव असलेली आहेत. त्यांना स्वतःमध्ये अधिक सारस्य आहे. या मुलांना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला लावतात. आयुष्यात एकदाच मिळालेला जन्म सार्थकी लावावा यासाठी विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींची नैतिक मूल्ये विकसित करण्याची गरज आहे. आपली देशाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सुहास कुलकर्णी यांच्या स्वागताने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर संचालिका सुनंदा आळतेकर यांनी परिचय करून दिला. सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते एस. वाय. प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन गायत्री बागलकोटकर यांनी केले. प्रदीपकुमार कुलकर्णी यांनी आभार मानले.