भाजप-काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप – अतिक्रमण हटवताना कारवाई
अलवर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील अलवर येथील सराई गोल चक्कर येथे रस्ता रुंदीकरणादरम्यान अतिक्रमण हटवण्यावरून वाद सुरू झाला आहे. वाटेत आलेल्या 300 वर्ष जुन्या मंदिरावरही बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईवरून भाजपने राजस्थानमधील काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस सूडाचे राजकारण करत असून विकासाच्या नावाखाली मंदिर उद्ध्वस्त करणे योग्य नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. त्याचवेळी राजगड नगरपालिकेत भाजपचे नेतृत्त्व असून त्यांनी ही कारवाई केल्याचे सांगत काँग्रेसने पलटवार केला आहे.
राजगड शहरातील एका पुरातन मंदिरावर जेसीबी चालवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मास्टर प्लॅननुसार राजगडमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. येथे वर्षानुवर्षे मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले होते. महसुली नोंदीनुसार सुमारे 60 फुटांचा रस्ता असून आता तो 25 फूटही राहिला नसल्यामुळे जेसीबीने अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या प्रकरणावरून आता बरेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली देवाच्या मंदिरावर हल्ला होणे अत्यंत खेदजनक आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकाऱयांचा अहवाल
मंदिर तोडण्याच्या वादानंतर अलवरचे जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम नकाते यांनी अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, पालिका मंडळाच्या दुसऱया बैठकीत 8 सप्टेंबर 2021 रोजी मास्टर प्लॅन आणि गौरव पथातील समस्या सांगून अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. 6 एप्रिल रोजी सर्व अतिक्रमणांवर मार्किंग करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पालिकेच्या कार्यकारी अधिकाऱयांनी (ईओ) 12 एप्रिल 2022 रोजी अतिक्रमण हटवताना पोलीस कर्मचाऱयांचीही मागणी केली होती, असे या अहवालात सांगण्यात आले. अतिक्रमण हटवण्याच्या दोन दिवस आधी सर्वांना कळवण्यात आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. ज्या मंदिराबाबत वाद आहे, ते मंदिर अलीकडेच नाल्यावर बांधण्यात आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वीच मूर्ती हटविण्यात आल्या असून राजगड नगरपालिकेतर्फे सदर मूर्ती इतरत्र लावल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
‘राजकीय’ चिखलफेक
राजगड शहरातील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येथील पालिकेत भाजपचे नेतृत्त्व आहे. त्यामुळे आपण फार काही सांगू शकत नाहीत, असे काँग्रेसचे आमदार जोहरीलाल मीना म्हणाले. दुसरीकडे, प्रशासनाच्या पातळीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. पालिका मंडळाच्या स्तरावर तसा ठराव मंजूर झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानंतरच अतिक्रमण हटवले जात आहे. प्रत्यक्षात 2012 च्या मास्टर प्लॅनमध्ये 60 फुटांचा रस्ता आहे. या मास्टर प्लॅनचा संदर्भ देऊन कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना भाजपच्या मंडळाने चूक केली आहे. सदर मंदिरावर बुलडोझर चालवणे योग्य नसल्याचे राज्यसभा खासदार आणि भाजप नेते किरोडीलाल मीना यांनी सांगितले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी, 300 वर्षे जुन्या मंदिराकडून अतिक्रमण कसे होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करत भाजपने आपली टीम घटनास्थळी पाठवली असून ती तीन दिवसांत आपला अहवाल देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.