जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगच्या दाहकतेमुळे हिमालयातील हिमनद्यांसह बर्फाच्या थराचे आकारमान घटण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला इशारा अतिशय गंभीरच म्हणावा लागेल. हिमालयातून सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रेसह प्रमुख दहा नद्या उगम पावतात. भारताच्या मोठ्या भूभागासह पाकिस्तान व चीनची भूमीही या नद्यांमुळे सुजलाम् सुफलाम् झाली असून, त्यांच्यामुळे जवळपास 100 ते 130 कोटी लोकांना पेयजलाचा पुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. त्या अर्थी या हिमनद्या म्हणजे वेगवेगळ्या देशांकरिता जीवनवाहिन्याच ठरतात. परंतु, या नद्यांवर ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा परिणाम होणार असेल, तर ती धोक्याची घंटाच म्हणता येईल. निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधता यावरच प्रामुख्याने मानवी जीवन अवलंबून आहे. मानवाने आपल्या बौद्धिक कौशल्याच्या बळावर आजवर लक्षणीय प्रगती केली असली, तरी निसर्ग परिसंस्थेतील विविध घटकांच्या आधाराशिवाय त्याला प्रगती साधणे अशक्य होय. हिमनद्या हादेखील असाच अत्यंत महत्त्वाचा घटक. पृथ्वीवरील सजीवसृष्टीकरिता हिमनद्या या आवश्यकच मानल्या जातात. कारण या नद्या म्हणजे पाण्याचे मुख्य स्रोतच असतात. जगातील एकूण जमीन क्षेत्रापैकी 10 टक्के भाग हा या नद्यांनीच व्यापलेला आहे. मुख्य म्हणजे या नद्याच कोट्यावधी लोकांसह प्राणी, पक्षी व सजीवसृष्टीतील इतर घटकांचे भरण पोषण करीत असतात. त्यामुळे हिमनद्यांवरील गंडातर हे पृथ्वी व जीवसृष्टीवरीलच महासंकट ठरते. मध्यंतरी अमेरिकेतील कार्निज मेलॉन विद्यापीठातील पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डेव्हिड रौंस यांच्या अध्यक्षतेखालील संशोधकांनीही एक अभ्यास अहवाल तयार केला होता. त्यातील निष्कर्षही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाशी मिळतेजुळते होते. जीवाश्म इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरूच राहिला, तर या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात असलेल्या एकूण हिमनद्यांपैकी 80 टक्के हिमनद्या नष्ट होतील, असा इशारा या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्याचबरोबर हवामान बदलाच्या वेगानुसार, या शतकाच्या शेवटाला हिमनद्यांच्या एकूण आकारमानापैकी 26 ते 41 टक्के आकारमान घटेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. आता संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुतेरेस यांनीही पाणीपातळी वेगाने कमी होणार असल्याचा दिलेला इशारा पुरेसा बोलका म्हटला पाहिजे. मागच्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपण पाहत आहोत. ढगफुटी, अतिवृष्टी, थंडीची लाट, उष्णतेच्या तीव्र लाटा, दुष्काळ अशा कितीतरी नैसर्गिक संकटांचे मूळ ग्लोबल वॉर्मिंग हेच असल्यावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत आहे. किंबहुना, हिमनद्यांच्या अस्तित्वावर याचा परिणाम होत असून, हिमालयासह वेगवेगळ्या भागातील हिमखंड वाढत्या तापमानामुळे वेगाने वितळण्याची भीती संभवते. आजमितीला अंटार्क्टिकात दरवर्षी 1500 कोटी टन, तर ग्रीनलँडमध्ये 2700 कोटी टन बर्फ दरवषी वितळत आहेत. या दोन्ही ठिकाणांनंतर सर्वाधिक हिमखंड हिमालयात असून, तेही वेगाने वितळत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण चिंतेत भर घालणारे ठरावे. मुख्यत: हिमखंड वितळण्याचा सर्वाधिक प्रभाव गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह तसेच पाणीपातळीवर पडू शकतो. याचबरोबर वेगाने हिमखंड वितळू लागल्यास पाकिस्तान आणि चीनमध्ये मोठे पूरसंकट निर्माण होण्याची शक्यता बळावते. स्वाभाविकच या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आशियातील देशांना तयार रहावे लागेल. भारतापुरता विचार करायचा झाल्यास गंगा ही भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. गंगा नदी सुमारे 2500 किलोमीटरपर्यंत वाहते. गंगेतील पाण्यावर अनेक राज्यांमधील सुमारे 40 कोटी जनता अवलंबून आहे. गंगा नदीला पाण्याचा मुख्य पुरवठा गंगोत्री हिमनदीतून होतो. परंतु तेथील हिमखंड धोक्मयात आला असून, मागील 87 वर्षांमध्ये 30 किलोमीटर लांबीच्या हिमखंडातील 1.75 किलोमीटरचा हिस्सा वितळला असल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे. भारतीय हिमालयीन क्षेत्रात 9575 हिमखंड असून, 968 हिमखंड एकट्या उत्तराखंडमध्ये आहेत. गंगा, मंदाकिनी, सरस्वती यांसारख्या नद्या भारतातील मैदानी भागांचे एकप्रकारे पोषण करतात. परंतु तापमानवाढीने हे सारे चक्रच विस्कळित होऊ शकते. तापमानवाढीची तीव्रता अशीच वाढत राहिली, तर 2050 पर्यंत कोट्यावधी लोकसंख्येला पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागेल. हिमनद्यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश आपल्या श्वेतकांतीवरून परावर्तित करणे. या परावर्तनामुळे पृथ्वीचे तापमान मर्यादित राहते. हिमनद्या जसजशा आक्रसत आहेत, तसतसा सूर्याचा अधिकाधिक प्रकाश पृथ्वी शोषून घेत आहे आणि त्यातून पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचा निष्कर्षही संशोधकांकडून काढण्यात येतो. यातून हिमनद्यांचे अस्तित्व, वहन एकूणच पर्यावरणासाठी किती महत्त्वाचे आहे, हे ध्यानात यावे. अलीकडे समुद्र पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. त्याकडे आपण दुर्लक्ष केले, तर त्याचेही भयंकर परिणाम होऊ शकतात, असेही गुतेरस यांनी म्हटले आहे. ती वस्तुस्थितीच होय. समुद्रकिनाऱ्यावरील अनेक भाग तसेच काही देशही पाण्याखाली जाण्याची भीती शास्त्रज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. हे पाहता दुहेरी संकटाशी आपल्याला दोन हात करावे लागतील. पाणी आणि जमीन या दोहोंशिवाय मनुष्य प्राणी जगू शकत नाही. पाण्याला आपण जीवन असे संबोधतो. त्यातूनच त्याची उपयुक्तता सिद्ध होते. पाऊस तसेच नद्या, तलाव, विहिरी अशा त्याच्या विविध स्रोतापासून पाण्याची उपलब्धता होते. परंतु, तापमानवाढीने नद्याच नामशेष होणार असतील, तर मानवी जीवनाचे काय, हा प्रश्न अधिक गडद होतो. औद्योगिक क्रांतीनंतर हरितवायू उत्सर्जनाची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. विकासाला पर्याय नसला, तरी त्यातून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे, त्यातून अंतिमत: जीवसृष्टीचेच नुकसान होणार. 2015 मधील पॅरिस परिषदेत हवामानासंबंधीचे संकट टाळण्यासाठी जागतिक तापमानवाढ 2 अंशांखाली म्हणजेच 1.5 अंशावर यावी, यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी सहमती दर्शविण्यात आली होती. आता त्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.
Previous Articleआठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स घसरणीत
Next Article युक्रेन युद्ध आणि ड्रगनची मध्यस्थी?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.