ऑनलाईन टीम / तरुण भारत :
इंदूरहून अमळनेरकडे येणारी एसटी बस मध्यप्रदेशातील धारजवळच्या नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्याप 25 जण बेपत्ता असून, घटनास्थळी मदत व बचावकार्याला वेग आला आहे. आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या जळगाव डेपोची इंदूर-अमळनेर-इंदूर (MH 40 N 9848) ही बस आज सकाळी 7.30 वाजता इंदूरहून निघाली होती. या बसमधून 50 ते 55 लोक प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडामुळे ही बस धारमधील खलघाट संजय सेतू पुलाचा कठडा तोडून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्याला वेग आला आहे. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे. या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.