लालपरी थांबली, प्रवाशांची गैरसोय : आज सुरळीत होणार
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील जत आणि अक्कलकोटवर दावा केला आहे. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा चिघळला आहे. परिणामी दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संभाजीनगर येथे कर्नाटकच्या बसना काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्राची लालपरी बेळगावात दाखल झाली नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा दोन्ही राज्यांची बससेवा विस्कळीत झाली आहे. महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱया 300 बसेसची सेवा तात्पुरती ठप्प झाली आहे. दरम्यान कर्नाटक परिवहनने शुक्रवारी भीतीच्या छायेखालीच महाराष्ट्रात बससेवा सुरू ठेवली होती. मात्र शनिवारपासून दोन्ही राज्यांची बससेवा सुरळीत सुरू राहील, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, कणकवली, वेंगुर्ला, मालवण, चंदगड, आजरा, गडहिंग्लज आदी ठिकाणांहून बस बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात येतात. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होते. मात्र सीमाप्रश्न पुन्हा चिघळल्याने शुक्रवारी सावधगिरी म्हणून कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आगारांनी एकही बस बेळगावकडे पाठविली नाही. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्राची लालपरी दिसून आली नाही. मात्र कर्नाटकच्या बस महाराष्ट्राच्या विविध मार्गांवर धावल्या. त्यामुळे सकाळपासून बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांची सोय झाली. याबाबत परिवहन अधिकाऱयांशी चर्चा केली असता कोणतीही बस बंद नाही किंवा राजकीय वादाचा बससेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले.
बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध भागात 350 हून अधिक बस धावतात. त्यामुळे बेळगाव आगाराला महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त होतो. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद राहिल्यास दोन्ही राज्यांना फटका बसतो. मात्र शुक्रवारी केवळ महाराष्ट्राची लालपरी बेळगावात आली नाही. मात्र कर्नाटकची बससेवा महाराष्ट्रात सुरळीत सुरू होती. त्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राला फटका बसला.
प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये
राजकीय वादाचा बससेवेवर कोणताही परिणाम नाही. कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यांची बससेवा सुरळीत सुरू आहे. सोशल मीडियावर बस बंद असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, दोन्ही राज्यांची बससेवा सुरळीत सुरू आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
के. के. लमाणी, (विभागीय संचार अधिकारी)