इंधनाचा खर्च निघत नसल्याने परिवहनचा निर्णय
बेळगाव : शहरात रात्री उशिराने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने रात्री साडेनऊपर्यंतच बससेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर बससेवा थांबविली जाणार आहे, अशी माहिती परिवहनने दिली आहे. कोरोनापासून रात्री उशिराने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसेस रिकाम्या फिरू लागल्या आहेत. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर बसेसना प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, रात्री आठ-नऊनंतर शहरात रिकाम्या बसेस फिरताना दिसत आहेत. त्यामुळे परिवहनवर अतिरिक्त इंधनाचा खर्च वाढू लागला आहे. यासाठी शहरातील बसेस रात्री साडेनऊनंतर बंद केल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत शहरांतर्गत रात्री उशिरापर्यंत विविध मार्गावर बसेस धावतात. मात्र, या बसमध्ये प्रवाशांची संख्या अगदी नगण्य असते. त्यामुळे इंधनाचा खर्चदेखील निघत नाही. तर काही वेळेला रिकाम्याच फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी रात्री उशिराने धावणाऱ्या बसफेऱ्या थांबविल्या जाणार आहेत.