दिवाळीच्या सुट्टीला आलेले चाकरमानी लागले परतू, सातारा बसस्थानकातून तब्बल 31 ज्यादा फेऱयाची सोय
प्रतिनिधी/ सातारा
नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीच्या सणाला मुंबई, पुण्याहून आलेले चाकरमानी मंडळी परतू लागले आहेत. सोमवारी आपल्या कामाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी रविवारीच प्रवास करण्यावर भर दिल्याने जिह्यातील साताऱयासह सर्वच बसस्थानके गजबजून गेली होती. महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा आगाराने पुण्या, मुंबईसाठी तब्बल 31 ज्यादा फेऱयांचे नियोजन करण्यात आले होते. महामार्गावरील तासवडे व आनेवाडी टोलनाका, खंबाटकी बोगदा परिसरात मेगाब्लॉक झाल्याने बराचकाळ वाहने अडकून पडत होती. तर महामार्गावरील वाहतुकही संथगतीने सुरू होती त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्गावर प्रचंड गर्दी होती. खड्डय़ात हरवलेल्या महामार्गावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱया रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यामुळेच या बोगद्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून ट्रफिक जामची समस्या निर्माण झाली होती.
दिवाळी निमित्ताने मुंबई, पुणे, ठाणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्ताने असलेली मंडळी आपल्या गावी आली होती. दिवाळी संपल्याने चाकरमानी मंडळी नोकरीच्या ठिकाणी सोमवारी हजर हेण्यासाठी रविवारी सकाळपासून आपल्या गावाहून निघण्याची तयारी करत होते. काही चाकरमानी मंडळी सांयकाळी निघत होते. त्यामुळे दिवसभर सातारा जिह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, कोरेगाव, पारगाव, दहिवडी, वडूज, फलटण या आगारात सकाळपासून गर्दी पहायला मिळत होती. तसेच जिह्यातील वडाप गाडय़ाही सुसाट सुटु होत्या. खाजगी वाहतूकदारांनी तर दिवाळीची ही गर्दी पाहून काहीशी तिकीट वाढ केली होती. त्यामुळे त्यांची दिवाळी तर प्रवाशांचे दिवाळे सुरु होते. दरम्यान, महामार्गावरही एकदमच वाहने मोठय़ा प्रमाणावर उतरल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
आरटीओ आणि पोलिसांकडून विनाकारण त्रास
वाहतूक कोंडी जेथे होते तेथे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी काम केले पाहिजे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात तर स्टॉपची कमतरता असतानाही दिवाळीच्या या सणाला दिवाळी कशी साजरी करता येईल याकरता ठिकठिकाणी थांबून वाहने तपासणी करण्यात येत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. विनाकारण वाहनधारकांना त्रास दिला जात असल्याचे दिसत होते.