दिवाळीच्या सुट्टीत किंवा एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीत काय करायचे हा प्रश्न मुला-मुलींच्या मनात असतो. खरे तर हा प्रश्न पालकांना जास्त भेडसावतो. मुला-मुलींचे म्हणणे असते सुट्टी आहे, त्याचा जरा आनंद घेऊ द्या. पालकांना वाटत असते आता यांना कोणत्यातरी उद्योगामध्ये गुंतवावे. सुट्टीमध्ये शाळेचा अभ्यास करायचा नसतो पण दिवसभर काहीच करायचे नाही, म्हणजे नेमके काय करायचे, हा प्रश्न आहेच. याला उत्तर एकच….शालेय शिक्षणामध्ये जे शिकवले जात नाही, ते शिकवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. पालकांनी त्यासाठी स्वतःचा बहुमुल्य वेळ खर्च करावा आणि त्यासाठी कोणत्याही क्लासला नाव न नोंदवता ती जबाबदारी आपल्याच शिरावर घ्यावी.
दिवाळीसाठी आवश्यक त्या किराणा सामानाची यादी करणे, कोणत्या पिठापासून कोणते पदार्थ करतात यावर घरी चर्चा करावी. विशेषतः मुलांनी पीठ मळून देणे, लाडू वळणे, वगैरे कामे करावीत. सर्वांसाठी चहा-कॉफी करणे, कणिक मळणे, दही लावणे, भेळ करणे, वरण-भाताचा कुकर लावणे अशी कामे प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांनी शिकवावीत. आता दिवाळीसाठी बरेच पदार्थ विकत घेतले जातात परंतु आपल्या घरामधील पुढच्या पिढीला याची माहिती मिळावी याकरिता काही पदार्थ मुलांच्या मदतीने घरी केल्यास वेगळय़ा अनुभवातून वेगळे शिक्षण मिळते. दिवाळीचे बजेट कसे तयार करावे, आपल्या घरातील दरमहाचे उत्पन्न किती, त्याचा आणि खर्चाचा मेळ कसा घालावा यावर कुटुंबातील सर्व सदस्यांनी चर्चा करावी, त्यामध्ये लहान मुलांचा सहभाग असावा. ‘तू अजून लहान आहेस, तुला यातले काही कळणार नाही’, अशी वाक्मये लहानपणापासून ऐकणाऱया मुलांचा आत्मविश्वास पालकांच्या अशा बोलण्यामुळे कमी होतो. भाजी मंडईमधून भाजी विकत घेणे, भाजी कोणती घ्यावी याचा निर्णय मुला-मुलीनी स्वतः घेणे, त्यासाठी रोख पैसे देऊन उरलेले पैसे भाजी विपेत्याकडून परत घेणे हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधून शिकण्यासारखे आहे. स्वतःचे मत तयार करणे, त्यानुसार निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची जबाबदारी घेऊन हाती घेतलेले काम पूर्ण करणे हे शाळेमध्ये शिकवले जात नाही. त्यामुळे सुट्टीमध्ये असे बरेच उद्योग करता येतात.
सर्जनशीलता (creativity) हा विषय शालेय शिक्षणाबाहेरचा आहे. एकाच प्रश्नाचे उत्तर वेगवेगळय़ा पद्धतीने कसे देता येईल, एकाच ठिकाणी वेगवेगळय़ा रस्त्याने गुगल मॅपशिवाय कसे पोहोचता येईल, एकाच प्रश्नाचे उत्तर दहा वाक्मयात, पाच वाक्मयात आणि एका वाक्मयात कसे देता येईल, अशी कौशल्ये शाळेत शिकवली जात नाहीत, त्याचा रियाज सुट्टीमध्ये करता येईल. चुका करण्यास शाळेत वाव नसतो. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही निर्णय घेणे मुलांवर सोपवावे. त्यामध्ये त्यांच्या काही चुका होतील, त्यावेळी त्यांना चुका करण्याची भीती वाटू नये असे वातावरण घरी निर्माण करता आले तर त्याचे दुरगामी चांगले परिणाम होतात. प्रश्न विचारणे शाळेत शिकवले जात नाही. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांना प्राणी संग्रहालयात, संग्रहालयात, चित्र प्रदर्शनामध्ये घेऊन जावे. तिथले फलक मुलांनी कोणाच्याही मदतीशिवाय वाचावे आणि त्यानंतर संग्रहालय बघावे. त्याबद्दल प्रश्न विचारण्यास पालक मुलांना प्रोत्साहन देऊ शकतात, जे शाळेत शक्मय नसते.
अलीकडे सर्वांचेच श्रवण कौशल्य कमी झाले आहे. गाणी यु टय़ुबवर बघितली जातात, ऐकली जात नाहीत. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकणे, वेगवेगळय़ा लहेजा-उच्चार पद्धतीची मराठी-इंग्रजी ऐकण्याचा रियाज सुट्टीमध्ये करता येईल. त्यासाठी यु टय़ूब आणि इतर माध्यमावर अनेक पॉडकास्ट उपलब्ध आहेत. संगीत यु टय़ूबवर बघण्याऐवजी यु टय़ूब म्युझिक ऍपवर ऐकावे. आवडलेल्या गाण्यांच्या गीताचे बोल इंटरनेटवर न बघता मुलांनी स्वतः ऐकता ऐकता लिहून काढावेत. लक्षपूर्वक ऐकण्याची सवय शाळा-कॉलेजमध्ये आणि त्यानंतरच्या करियरमध्ये उपयोगी पडते. यानिमित्ताने मुले-मुली एक तासापेक्षा जास्त वेळ एकाच जागेवर बसून आवडते काम करतील याकडे पालकांनी लक्ष द्यावे. गेल्या काही वर्षात एकच काम पूर्णपणे लक्ष केंद्रित करून किमान एक तास करण्याची सर्वांची कुवत कमी झाली आहे. पालकांनी मुलांसोबत वेगवेगळी पुस्तके एक तास वाचत बसण्याचा उपक्रम सुरु केल्यास त्याचे बरेच फायदे होत राहतील.
पुढाकार घेऊन काही करणे, मित्रमंडळींनी एकत्र येऊन एखाद्या ट्रीपचे नियोजन करणे, फराळाचे पदार्थ किंवा आकाशकंदील तयार करून विकण्याचा उद्योग केल्यामुळे मुला-मुलींना नेतृत्व कौशल्य आत्मसात करता येईल. त्यासाठी भिन्न स्वभावाचे मित्र जमतात, त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते, ‘संभाषण कला’ ही अशाच प्रकारे एकत्र काम करण्याने शिकता येते. ‘मी म्हणेन तीच पूर्व दिशा’ असा दुराग्रह करता येत नाही. हे सर्व शिक्षण शाळेमध्ये मिळत नाही. सर्वांवर चिडणारा आणि त्याचे जाहीर प्रदर्शन करणारा कप्तान होण्यापेक्षा धोनी होण्यासाठी वेगळे गुण अंगीकारावे लागतात. हे शिक्षण सर्वांबरोबर सहकार्याच्या भावनेने काम केल्यास मिळू शकते. त्यासाठी अर्थातच वेळेचे नियोजन करावे लागते. त्याचेही शिक्षण सुट्टीच्या वेळात शाळेबाहेरच घ्यावे लागते.
शिष्टाचार, सभ्य रीतभात, सभ्य आचार विचार हे सुद्धा शाळेमध्ये शिकवले जात नाहीत. दुसऱया व्यक्तीस त्रास होईल असे वर्तन न करणे हा शिष्टाचार आहे. चित्रपटगृहामध्ये सिनेमा सुरु झाल्यानंतर प्रवेश केल्यास मोबाईलचा प्रकाश टाकणे, मोठय़ाने बोलणे, समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे, सिनेमा सुरु असताना हातातल्या प्लास्टिक पिशवीचा आवाज करणे, हे सर्व इतराना त्रासदायक असते.
रस्त्यावर कुठेही चालत्या वाहनांना थांबवून रस्ता ओलांडणे, बाईक-कारचा हॉर्न वाजवणे, रस्त्यावरून दोघा बाईकस्वारांनी बाईक चालवताना गप्पा मारत चालवणे आणि त्यामुळे इतरांची अडवणूक करणे, थुंकणे ही असभ्य वर्तनाची उदाहरणे आहेत. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी आतील व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी जागा करून देणे, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल धरणे हे शिष्टाचाराला धरून आहे. असे शिष्टाचार पालकांनी स्वतःच्या आचरणातून घरातील पुढच्या पिढीला शिकवावेत. कायदे कोणते आहेत आणि आपण त्याचे पालन कसे करावे याचेही शिक्षण पालकांनी देणे गरजेचे आहे. मुलाला शाळेत सोडताना घाई-गडबडीमध्ये वडिलांनी सिग्नल तोडल्यास पुढे हीच मुले वडिलांचे अनुकरण करतात.
अचानक काही अडचण उद्भवली तर काय करावे, कोणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले-अपघात झाला, कुठेही आग लागली, कोणी चक्कर येऊन पडले, तर तत्परतेने काय करावे याचे शिक्षण शाळेमध्ये मिळत नाही. शहरातील मुलांपेक्षा गावातील मुले-मुली अशा परिस्थितीला तोंड देण्यात जास्त सक्षम असतात कारण त्यांना घरामधून स्वतःच्या जबाबदारीवर शाळेत जावे लागते. शाळेची बस त्यांच्या दारी येत नाही. गावामधील मुला-मुलींना चार-पाच किलोमीटर चालावे लागते किंवा सायकल चालवावी लागते. या प्रवासामध्ये काही कठीण प्रसंग उदभवला तर त्याला तोंड देण्यास छोटय़ा गावातील मुले-मुली सक्षम असतात. गावामधील मुले वेळ पडल्यास शेतामध्ये काम करतात. शहरामधील मुले सोसायटीच्या बाहेर कुठेही खेळायला जात नाहीत. त्यामुळे शहरातील मुला-मुलींनी असे निर्णय घेणे शिकण्यासाठी स्वतंत्रपणे फिरावे. पालकांनी त्यांच्या मुलांना दिवाळीचा फराळ, मिठाई नातेवाईक-मित्रांच्या घरी पोहोच करण्यासाठी लांबच्या अंतरावर पाठवावे. घरकाम करणाऱयांच्या वस्तीत जाऊन त्यांचे घर शोधून त्यांना मिठाई देण्याचे काम मुलांनी केल्यास चांगले संस्कार होतात. फटाके उडवण्यामधून बरेच लहान-सहान अपघात होत असतात. त्यासाठीच पालकांनी मुलांना फटाके कसे बनवतात, त्याच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दाखवावे, फटाक्मयांच्या आवाजामुळे जवळपासचे प्राणी-पक्षी कसे घाबरतात हे समजावून सांगावे.
घरातील किरकोळ इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती, सभाधीटपणा, किमान दहा-वीस जणांसमोर कोणत्याही विषयावर उत्स्फूर्तपणे बोलण्याची कला, स्त्री-पुरुष समानता असे अनेक विषय आहेत जे पालकांनी घरीच आचरणामधून शिकवणे आणि त्यावर चर्चा करणे गरजेचे आहे. अर्थात हे मुला-मुलीना पालकांच्या कृतीमधून अप्रत्यक्षरीत्या कळणे श्रेयस्कर, कारण या विषयावर कोणीही भाषण दिलेले कोणत्याही वयाच्या मुलाना आवडत नाही. शालेय शिक्षणाच्या बाहेरच्या अशा विषयांची यादी करताना बरेच विषय सापडतील. आनंददायी शिक्षण देता-घेता दिवाळी साजरी करण्यासाठी समस्त बालक-पालकांना शुभेच्छा.
-सुहास किर्लोस्कर