ऑनलाईन टीम / मुंबई
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा (neerav modi) सहकारी सुभाष शंकरला (subhash shankar) इजिप्तच्या कैरोहून भारतात परत आणण्यात सीबीआयला (CBI) यश आलं आहे. तो नीरव मोदीचा जवळचा सहकारी आहे. 2018 मध्ये नीरव मोदीसोबत तो भारतातून पळून गेला होता. त्याला देशात परत आणण्यासाठी सीबीआय अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. अखेर यात यश मिळालं. बँक फसवणूक प्रकरणातील हा एक आरोपी आहे.
पीएनबी बँकेत नीरव मोदीने 6500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यानंतर नीरव मोदी त्याचा भाऊ विशाल मोदी आणि त्याचा सुभाष शंकर परदेशात पळून गेले होते. चार वर्षांपूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधिश जे.सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती.
आरोपपत्रानुसार साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप सुभाषवर आहे. त्याच्यावर एक मुख्य आरोपपत्र आणि दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तपास यंत्रणा बऱ्याच दिवसांपासून याचा शोध घेत होत्या. अखेर सीबीआयला यश आले असून, सुभाष शंकर याला कैरो येथून मुंबईत आणण्यात आले आहे. सुभाषला मुंबई कोर्टासमोर हजर करून सीबीआय आता त्याची रिमांड आपल्या ताब्यात घेणार आहे.