अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा भाव प्रति क्ंिवटल स्थिर आहे. तर रताळय़ाचा भाव 200 रुपयांनी वाढला आहे. भाजी मार्केटमध्ये टोमॅटो, गवार, कोबी, वांगी, कोथिंबीर, भाजीपाल्यांचा भाव घसरला आहे. तर इतर भाजीपाल्यांचा भाव मात्र स्थिर आहे. तर रब्बी हंगामातील बटाटा लागवडीसाठी जवारी बटाटा बियाण्यांसाठी खरेदी करण्यासाठी शेतकऱयांची गर्दी वाढली होती.
केंद्र सरकारतर्फे प्रत्येकी खाद्यपदार्थ नियमित प्रमाणात दरवर्षी खरेदी करून साठवणूक करून ठेवतो. एखाद्या खाद्यपदार्थाचा भाव वाढला की तो पदार्थ सरकारी कोटय़ामधून बाजारात पुरवून भावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकार करते. त्याचप्रमाणे कांद्याचा भाव आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातून परदेशामध्ये निर्यात होणाऱया कांद्यात कपात करण्यात आली आहे आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात महाराष्ट्र नवीन कांद्याचे उत्पादन येणार असल्याने केंद्र सरकार मागील वर्षी साठवणूक ठेवलेल्या कांद्याची आवक थोडय़ा-थोडय़ा प्रमाणात विक्रीसाठी देशभरातील बाजारात विक्रीसाठी पाठवत आहे. यामुळे सध्या कांद्याचा भाव टिकून असल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
तालुक्यातील जवारी बटाटा आवक आटोक्यात
सध्या बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा आवक आटोक्यात आली आहे. यामुळे रब्बी हंगामोतील बटाटा लागवड करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मीडियम आणि मोठवड, पांढरा जवारी बटाटा बियांणांची खरेदी करत आहे. लाल जमिनीतील बटाटा जवळपास संपत आला आहे. यामुळे अल्प प्रमाणात लाल बटाटा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. जानेवारीमध्ये इंदोरचा नवीन बटाटा काढणीला सुरुवात होणार आहे. यामुळे शितगृहामध्ये साठवून ठेवलेला जुना इंदोर बटाटा त्वरित काढून देशातील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. शितगृहे खाली करून जानेवारीमध्ये नवी बटाटा शितगृहामध्ये साठवून ठेवण्यात येणार असल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
रताळय़ाची मोठय़ाप्रमाणात आवक
शनिवारच्या बाजारात रताळय़ाची सुमारे 12 हजार पिशव्यांची आवक झाली असून, सध्या रताळी बेळगाव जिल्हय़ासह पंजाब, दिल्ली, हरियाणा, गुजरात याठिकाणी पाठवली जात आहेत. सध्या थंडीचे वातावरण असल्याने खाण्यासाठी तेथून मागणी येत असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
भाजीपाल्याचा दर वाढल्याने लागवडीत वाढ
सध्या बेळगाव जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन झाले आहे. यंदा भाजीपाल्याला दर वाढीव मिळाल्याने शेतकरी अन्य पिके न घेता भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. यामुळे भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यामुळे टोमॅटो, गवार, कोबी, वांगी, कोथिंबीर, भाजीपाल्यांच्या दरात घसरण झाली आहे. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.