केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
नवी दिल्ली
सध्या वाहन उद्योग 7.5 लाख कोटी रुपयांचा झाला आहे, परंतु आम्हाला या क्षेत्राची उलाढाल 15 लाख कोटी रुपयांवर न्यायची आहे. यामुळे आगामी काळात देशात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे सांगत 2030 पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. आम्ही बायो-इथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारखे पर्यायी, स्वच्छ आणि हरित इंधन विकसित करण्यावरही काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयएनव्हीआयटीत गुंतवणूक शक्य
इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आयएनव्हीआयटी) च्या लिस्टिंगच्या यशाबद्दल सांगत गुंतवणूकदारांकडून खूप उत्सुकता यात दिसून आली असल्याचे गडकरी म्हणाले. आयएनव्हीआयटी ही म्युच्युअल फंडासारखी सामूहिक गुंतवणूक योजना आहे. यामध्ये वैयक्तिक आणि औद्योगिक गुंतवणूकदार पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये थेट गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा उद्देश उत्पन्नाच्या छोटय़ा भागातून थेट गुंतवणुकीवर परतावा मिळवणे असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आम्हाला निधीची अडचण नाही
‘लहान गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा मिळत आहे, जो बँकांपेक्षा चांगला आहे. आम्हाला निधीची कोणतीही अडचण नसून आम्ही पुढील वर्षी 5 लाख कोटी रुपयांसाठी काम करू.’ असेही गडकरी म्हणाले.