मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला विश्वास ः भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थेत असेल
नवी दिल्ली
भारत 2047 पर्यंत 3 ट्रिलियन डॉलर्स ते 40 ट्रिलियन डॉलर्स (40 लाख कोटी) पेक्षा जास्त अर्थव्यवस्था असलेला देश बनेल. यासोबतच जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचाही समावेश होणार आहे, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि डिजिटलायझेशन याला चालना दिली जाणार आहे. मंगळवारी पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
अदानीपेक्षा अंबानी अधिक आशावादी
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यापेक्षा मुकेश अंबानी यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचा अंदाज अधिक आशादायी आहे. वाढत्या उपभोग आणि सामाजिक-आर्थिक सुधारणांसह भारत 2050 पर्यंत 30-ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, असे अदानी यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते. भारत सध्या अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे.
तीन घटकांमुळे होणार क्रांती
मुकेश अंबानी म्हणाले की, तीन क्रांती येत्या दशकांमध्ये भारताच्या वाढीत योगदान ठेवतील. पहिली स्वच्छ ऊर्जा, दुसरी जैव-ऊर्जा आणि तिसरी डिजिटल क्रांती. स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा निर्माण होईल. डिजिटल क्रांतीमुळे आम्हाला ऊर्जा कार्यक्षमतेने वापरता येईल. तीन क्रांती एकत्रितपणे भारत आणि आपल्या सुंदर ग्रहाला हवामान संकटापासून वाचवतील.
अंबानी म्हणाले, ‘भारताचे भावी नेते म्हणून तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की देश जागतिक स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्रांतीचे नेतृत्व करेल. या मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी 3 मंत्र आहेत-थिंक बिग, थिंक ग्रीन आणि थिंक डिजिटल.’
आई आणि वडिलांपेक्षा मोठा ‘जी’ नाही
त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, 4जी आणि 5जी च्या जमान्यात आई आणि वडिलांपेक्षा मोठा ‘जी’ नाही. ते विद्यार्थ्यांना म्हणाले, ‘आजकाल प्रत्येक तरुण 4जी आणि 5 जी बद्दल उत्साही आहे, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की या जगात ‘माताजी आणि पिताजी’ पेक्षा मोठा कोणताही ‘जी’ नाही. ते तुमचा सर्वात विश्वासू आधारस्तंभ राहतील.’
बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष अंबानी
पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी हे नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन कौन्सिलद्वारे सर्वोच्च श्रेणी ‘एक’ बहाल केलेले गुजरातमधील पहिले आणि एकमेव खाजगी विद्यापीठ आहे. अंबानी हे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आहेत. सध्या, विद्यापीठात 6,500 हून अधिक विद्यार्थी आणि संशोधन अभ्यासक अभ्यास करत आहेत.