पोटनिवडणूक निकाल : भाजपच्या पदरी निराशा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला सर्व पाचही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगडमध्ये पोटनिवडणुकीची शनिवारी मतमोजणी झाली. त्यात भाजपच्या पदरी निराशा आली असून लोकसभेत भाजपचे बळ एकने कमी झाले आहे. तर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार संख्येत एकाची भर पडली आहे.
देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले, तर बालीगंगे विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो विजयी झाले. दुसरीकडे, बिहारमधील बोचहान विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा जवळपास 19,000 मतांनी पराभव केला. तसेच छत्तीसगडच्या खैरागड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी 20 हजार 167 मतांनी विजय मिळवला आहे.
बंगालमध्ये टीएमसीचा बंपर विजय
पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या अग्निमित्र पॉल यांचा 2 लाख 64 हजार 913 मतांनी पराभव केला. गेल्या वषी बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. सुप्रियो यांनी भाजपमधून बाहेर पडत टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. यात ते 20 हजार 228 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या किया घोष आणि मार्क्स कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह यांचा पराभव केला. माजी आमदार आणि राज्यमंत्री सुब्रतो मुखर्जी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.
बिहारमधील बोचहान विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. 17 वर्षांनंतर राजदने बोचहानमध्ये विजय नोंदवल्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपची पारंपरिक व्होट बँक हादरली आहे. रमाई राम यांनी शेवटच्या वेळी 2005 मध्ये कंदील चिन्हावर निवडणूक जिंकली होती.
छत्तीसगडमधील खैरागड पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार यशोदा वर्मा यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे कोमल सिंग जंगले यांचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर जेसीसीजेचे उमेदवार नरेंद्र सोनी यांनाही डिपॉझिट वाचवता आले नाही. अपक्ष उमेदवार चरण साहू यांना त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. काँग्रेसच्या यशोदा वर्मा पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या.