अध्याय तेविसावा
मनावर नियंत्रण ठेवणे फार अशक्मय असते. त्यासाठी कोणतीही सिद्धी उपलब्ध नाही. देवादीकानाही मन दाद देत नाही उलट त्यांनाच अडचणीत आणायला ते कमी करत नाही असे दाखले पुराणात आढळतात. तेव्हा मनापुढे सर्वांनी हात टेकलेले आहेत. भगवंत उद्धवाला म्हणाले, मनाला ताब्यात ठेवायला मनच सक्षम असते जर मनानेच निश्चय केला तर मनच स्वतःला ताब्यात ठेऊ शकते पण त्यासाठी त्याला कशात तरी गुंतवण्याची आवश्यकता आहे.
आपल्या दैनंदिन व्यवहारातही आपण पाहतो की, जर आपले मन विशिष्ट कार्यात गुंतले असेल तर त्याला इतर विषयोपभोगाच्या गोष्टींची आठवण होत नाही कारण दिवसभर त्याच्या मागे हाती घेतलेल्या कामाचे व्यवधान असते पण व्यवहारातील गोष्टी मनाला सतत गुंतवून ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत काही काळाने ते पुन्हा विषयोपभोगाच्या गोष्टीत रमू लागते. आपल्या सद्गुरुंनी ही बाब बरोबर ओळखलेली असते म्हणून आपले मन कुठे गुंतले आहे हे हेरून ते त्याला तेथून अलगद बाजूला करतात आणि ईश्वराच्या भक्तीत
गुंतवतात.
म्हणून मनावर ताबा मिळवून त्याला आटोक्मयात आणण्याची शक्ती फक्त सद्गुरुंकडे असते परंतु त्यासाठी सद्गुरुंची पूर्ण कृपा होणे आवश्यक आहे. सद्गुरु कृपेपुढे मनाचे काही चालत नाही. ते गुरुच्या पायांपाशी ठेवले असता साधकांना संतोष देते. सद्गुरु मनाला परमार्थ मार्गावर आणून सोडतात. मन एकदा एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, काही झाले तरी त्या गोष्टीची पाठ सोडत नाही.
सद्गुरुंच्या कृपेने ते जर आपणहून परमार्थाकडे लागले, तर चमत्कार घडवते आणि चारही मुक्तींना आपल्या पायाची दासी करून ठेवते आणि परब्रह्मच बांधून हातात देते. मन हेच मनाचे प्रकाशक आहे, मन हेच मनाचे साधक आहे, मन हेच मनाला बाधक आहे आणि मन हेच मनाला घातक आहे. म्हणूनच म्हणतात की, मनोभावे सद्गुरुंना शरण जावे व त्यांच्या शिकवणुकीनुसार वागावे म्हणजे आत्मकल्याण होते. ज्याप्रमाणे वेळू आपले वेळवांचे बेट वाढवितो आणि एक वेळू दुसऱया वेळूवर घासला जात असता आपणच विस्तवाची ठिणगी पाडून आपल्यालाच समूळ जाळून टाकतो, त्याप्रमाणेच मन हेच मनाला मरण यावे असे चिंतील तेव्हांच ते सद्गुरुला शरण गेले असे समजावे. असे मन सद्गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून निरभिमानपणाने गुरुभजन करते. पूर्णपणे सद्गुरुकृपा झाल्यावर हे मनच मनाला खूण दाखवून देते आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते. मनच मनावर प्रसन्न झाले असता वृत्ति निरभिमान होते. याप्रमाणे मनाने आपणच साधकांना निजसमाधान साधून दिले असे होते. गुरुभक्तीतून गुरुकृपेची गोडी लागल्यावर आपल्या मनोजयाची गुढी त्वरित उभी करून मनच ती प्रत्यक्ष साधकाच्या हातात देते. याप्रमाणे साधकाला मन हेच आपला आपण पूर्णपणे जय करून देते, आणि शेवटी सद्गुरुंच्या आत्मज्ञानात मन हेच आत्मस्वरुपाने पूर्णपणे लीन होते.
ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात शिरून स्वतः प्रत्यक्ष विरून जाऊन समुद्रामय होतो, त्याप्रमाणे साधकही निरभिमानी होताच. मी तू पण नष्ट करून स्वतः पूर्णब्रह्म होतो हे लक्षात ठेव. मग त्याच्या आत्मदृष्टीला सर्व सृष्टीत मीच काय तो एक भरलेला आहे असे दिसू लागते, मी तू पणाची झाली बोळवण अशी अवस्था होते, द्वंद्वाची त्रिपुटी नाहीशी होते. स्वतःचे अस्तित्व आत्मज्ञानात लीन झाल्यामुळे देह वेगळा आणि मी वेगळा ही खात्री झाल्यामुळे देहाच्या सुखदुःखाबद्दल आपलेपणा वाटत नसल्याने सुखदुःखाचे महत्त्वच नाहीसे होते.
अशा अवस्थेत कसले सुख आणि कसले दुःख? कसला बंध आणि कसला मोक्ष? पंडित कोण आणि मूर्ख कोण? सर्वत्र एकटे एक ब्रह्मच. तेथे देव कोण आणि भक्त कोण? शांत कोण आणि अशांत कोण? द्वैत-अद्वैत लयास जाते, आणि एक परब्रह्मच सदोदित स्वानंदरुपाने राहते. तेथे क्रिया आणि कर्म नाहीशी होतात. धर्म आणि अधर्म लज्जेनेच नष्ट होतात.
क्रमशः