‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा, ज्ञान येत असे फार’ या उक्तीचा प्रत्यय विद्यार्थी दशेमध्ये कितीजण घेतात आणि किती पालक आपल्या मुला-मुलींना तसा अनुभव घेण्याचे स्वातंत्र्य देतात? आपल्या ठराविक मित्रमंडळींच्या परिघाबाहेर जाऊन मित्र जोडण्याची आपली मानसिकता शालेय जीवनापासून नसते. कोणत्याही (अ-राजकीय) सभेमध्ये, व्याख्यानमालेमध्ये वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना घेऊन जातो का? तरीही कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा सभेमध्ये हजेरी लावलीच, तर आपला द=िष्टकोन शक्मयतो मागच्या बाकावर/रांगेत बसण्याचा का असतो? अशी परिस्थिती अनेक घरांमध्ये असेल तर या उक्तीमधून आपण काहीच शिकलो नाही, असे म्हणता येईल? एकूणच ज्ञान मिळवण्यासाठी पाल्याला शाळेत घालणे, एवढेच कर्तव्य पालक या नात्याने आपण करत आहोत का?
या उक्तीमधील फक्त पर्यटनाचा विचार केला तर शालेय जीवनात इतिहास-भूगोल केवळ पुस्तकात वाचलेला असल्यामुळे त्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गावा-शहराबाहेर फार माहिती नसते. अनेक गड-किल्ल्यांची माहिती शालेय पुस्तकात आपण वाचलेली असते, त्यातील किल्ले-गड आपल्याला शालेय जीवनात अनुभवता येत नाहीत. अनेक शाळा सातवी-आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सहली आयोजित करतात. इतर कोणत्याही गावा-शहराला, राज्याला भेट देण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची आपली मानसिकता तयार करायची असेल तर त्याचे बाळकडू शाळेतच मिळावे. पण घडते याच्या नेमके उलटेच.
शहरातील विद्यार्थी शक्मयतो जवळच्या शाळेत जातात. अशा जवळच्या शाळेमध्ये सोडणे आणि शाळेतून घरी आणणे यासाठी आता पालक स्वतः त्याची तजवीज करतात. त्यामुळे मुला-मुलींना अर्धा तास चालावे लागत नाही. घरापासून शाळेचे अंतर लांब असेल तर आता बस-रिक्षा अशा वाहनांची सोय असते. शाळेच्या बसच्या वेळेत अनेक सोसायटय़ांच्या बाहेरचे दृश्य बघण्यासारखे असते. तिसरी-चौथीपेक्षा अधिक इयत्तेमध्ये असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना सोसायटीच्या दारामध्ये शाळेची बस येत असेल तरीही सोसायटीच्या गेटपर्यंत सोबत करण्यासाठी पालक असतात. सात-आठ वर्षाच्या मुला-मुलांना शेजारच्या सोसायटीमध्ये जाण्यासाठीसुद्धा पालक मदत करतात. त्यामुळे सात-आठ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुला-मुलींचे बोट सोडण्याची पालकांची मानसिकता नसते. अर्थातच हे विद्यार्थी बारा-तेरा वर्षाचे झाले तरीही त्याना स्वतंत्रपणे रस्ता ओलांडता येत नाही. वेळीच बोट न सोडलेली मुलांची स्वतंत्रपणे प्रवास करण्याची मानसिकता पालक तयार होऊच देत नाहीत. ‘आमचा छकुला आम्हाला सोडून कुठेही रहात नाही’, हे पालक अभिमानाने सांगतात. त्यामुळे अशी मुले वयाने वाढल्यावर अनेक अनुभव स्वतंत्रपणे घेऊन त्यामधून शिक्षण घेऊ शकत नाहीत.
छोटय़ा-मोठय़ा गावातील मुला-मुलींना रोज तीन-चार किलोमीटर चालण्याची सवय असते आणि असे अंतर चालता चालता पार करून ती मुले शाळेत जातात. कोकणात असो वा पुणे-कोल्हापूर-नागपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावरच्या गावामध्ये नियमित वाहनांची सोय नसते. एसटीच्या संपामुळे ही परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. त्यामुळे गावातले शालेय विद्यार्थी अशा प्रसंगाला सरावलेले असतात आणि तेच अडचणीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यास लहानपणापासून शिकतात. भोर/मंचर तालुक्मयातील अनेक विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यावर समजले की त्यांचे घर आणि शाळा यामधील अंतर कमीतकमी एक-दोन कि.मी. आणि जास्तीत जास्त सहा-सात कि.मी. असते, जे अंतर चालत पार करणे या विद्यार्थ्यांच्या सवयीचे झाले आहे. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी रोज दहा-पंधरा कि.मी. अंतर सायकलवरून पार करतात. या प्रवासामधून तावून-सुलाखून निघालेले विद्यार्थी कोणत्याही वेळी अचानक आलेल्या संकटाला सामोरे कसे जायचे याला सरावलेले असतात.
एप्रिल-मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पालक काही दिवसांसाठी परगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु ती ठिकाणे सहसा ठरलेली असतात. या प्रवासाचे नियोजन करताना पालकांनी आपल्या पाल्याला बरोबर घेतल्यास प्रवास करण्याचे अनेक पर्याय, त्याचा खर्च, राहण्याचा खर्च, प्रेक्षणीय स्थळे अशा अनेक विषयांवर चर्चा करता येते ज्यामधून मुले शिकतात. ज्यांना शक्मय असेल त्यांनी किमान एक-दोन वर्षातून एकदा महाराष्ट्रातील न बघितलेल्या पर्यटन स्थळाला भेट देणे आवश्यक आहे. कोकणातला समुद्र, मुंबईतला लोकल प्रवास, जिजामाता उद्यान (मुंबई)- एम्प्रेस गार्डन (पुणे)- टाऊन हॉल (कोल्हापूर) अशा उद्यानामधील झाडांचे वैविध्य, महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले, अभयारण्ये असे अनेक पर्याय प्रेक्षणीय आहेत. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना पर्यटन करण्यासाठी दोन किंवा चार वर्षातून एकदा काही दिवसांची रजा मंजूर करतात, प्रवासाचा खर्च देतात, त्याचा खरेच किती कर्मचारी भारतभर फिरण्यासाठी वापर करतात? आपले पर्यटन फक्त धार्मिक स्थळांना भेट देण्यापुरते मर्यादित असू नये. शालेय जीवनात वेगवेगळय़ा गावा-शहरांना भेट देण्याचा अनुभव गाठीशी असणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. दुसऱया गावा-शहरामध्ये जाताना त्या भागाची संस्कृती, बोली भाषा, जेवणा-खाण्याच्या सवयी, पेहेराव याचा पूर्व अभ्यास पालकांनी पाल्यासमवेत करावा. केरळ-तामिळनाडूमध्ये चहाऐवजी कॉफी पिण्याची सवय असते. तिथल्या कॉफीचे वैविध्य कसे असते याची माहिती घेतल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपण सवयीने जी कॉफी पितो ती खरे तर कॉफीचा वास येणारी बासुंदी असते.
दहावीनंतर मुला-मुलींना एकटय़ाने प्रवास करण्याची सवय लागावी या उद्देशाने पालकांनी आपल्या पाल्याला बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर शक्मयतो महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात वेगळा पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पाठवावे. सोबत कोणीही नातेवाईक अथवा मित्र-मैत्रिणी नसाव्यात. आठ दिवसांच्या प्रवासात नियोजन करणे, गाईडला अनेक प्रश्न विचारून माहिती घेणे, अनोळखी प्रदेशातील स्थळांची माहिती घेणे, तिथल्या रहाणीमानाप्रमाणे ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत वेगळे जग अनुभवण्याची, त्या स्थळाचा इतिहास, भूगोल, झाडे-प्राणी-पक्षी आणि त्यामधील वैविध्य वगैरे माहिती स्वतः प्रश्न विचारून घेणे, नवे मित्र जोडणे, अशा सवयी लागल्यानंतर पुढील शिक्षणात त्याचा उपयोग होऊ शकतो.
दहावीनंतर आपल्या पाल्याला गावा-शहरामध्ये कुठेही सोडण्यासाठी जे पालक स्वतः जातात किंवा सोबतीला कोणालाही पाठवतात, त्यांची मुले-मुली करीयर संबंधी कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नाहीत.
इतकेच नव्हे तर आयुष्यात काही अडचणी आल्यास त्यामधून ‘हिरकणी’प्रमाणे स्वतः मार्ग काढू शकत नाहीत. त्यामुळे मुख्य मुद्दा पालकांनी आपल्या पाल्याचे बोट वेळीच सोडण्याचा आहे. पर्यटन हे त्याचे निमित्त आहे.
– सुहास किर्लोस्कर