बेळगावात मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांबरा विमानतळावर यासंबंधीचे सुतोवाच केले आहे. यासाठी आपण केंद्रिय नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे बेळगावला आगमन झाले. सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या आपण जनसंकल्प यात्रेत मग्न असलो तरी दिल्लीला जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व इतर ज्ये÷ नेत्यांची भेट घेऊन मंत्रीमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तरी बेळगावला शुभसमाचार मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सगळय़ांना सांगूनच मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी तुम्हालाच कळेल, असे सांगितले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे संबंधी पत्रकारांनी विचारले असता तोच तोच प्रश्न किती वेळा विचारणार? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी उत्तर देणे टाळले. मुरघा मठाधीशांच्या प्रकरणासंबंधी समाजातील काही प्रमुखांनी तुमची भेट घेतली आहे. यावर तुमची भूमिका काय असणार आहे? असे पत्रकारांनी विचारले असता यापूर्वीच आपण या विषयावरही भूमीका मांडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.