जिल्हाधिकाऱयांना कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अग्निपथ योजना सुरू करून तरुणांना बेरोजगार बनविण्याचा केंद्र सरकारचा घाट आहे. केवळ चार वर्षे नोकरीत यायचे आणि त्यानंतर बेरोजगार बनवायचे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. तेव्हा ही योजना तातडीने बंद करावी. पुस्तकांमध्ये चुकीचा उल्लेख करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नदेखील सरकारने केला आहे. त्याचा निषेध भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला आहे. अग्निपथ ही योजना कंत्राटी पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणांकडून करार करायचा, त्यानंतर त्यांना चार वर्षे काम करायला सांगायचे, त्यानंतर त्यांना बेरोजगार बनवायचे हे योग्य नाही.
राष्ट्रीय पत्रकार महम्मद जुबेर यांना अटक केली आहे. त्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी जी. एम. जैनेखान, मंदा नेवगी, जी. व्ही. कुलकर्णी, एल. एस. नायक, नागप्पा संगोळ्ळी, एफ. एम. नदाफ, दोड्डप्पा पुजारी, प्रवीण नाईकवाडी, निवास शेख, एस. एम. कुलकर्णी उपस्थित होते.