कामगारांचे सुवर्णसौध परिसरात आंदोलन
बेळगाव : धारवाड येथील टाटा मायोक्रोपोलो मोटर्समधील 15 वर्षांहून अधिक सेवा बजाविलेल्या 1200 हून अधिक कायमस्वरुपी कामगारांना सेवेतून काढण्यात आले. त्यामुळे याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. असे असतानाही 412 कामगारांची बदली लखनौ येथे करण्यात आल्याने ही बदली प्रक्रिया रद्द करावी, या मागणीकरिता कामगारांच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सुवर्णसौध येथे आयोजित केलेल्या आंदोलनात शेकडो कामगारांनी सहभाग घेतला होता. यावेळी कामगारांनी विविध मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, तसेच टाटा मोटर्सने चालविलेली बदली प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. 412 कामगारांची बदली अचानकपणे लखनौ येथे केली आहे. वास्तविक पाहता कामगारांना प्रारंभी कमी करण्यात आल्याने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर वाद न्यायालयात प्रलंबित असताना कामगारांची बदली करण्याचा प्रकार व्यवस्थापन मंडळाने केला आहे. तसेच कामगारांचे वेतन थांबविण्याचा प्रकारही चालविला आहे. त्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मागील तीन वर्षांपासून कामगारांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे रखडलेले वेतन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. याप्रकरणी लक्ष घालून कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी धरणे आंदोलनाद्वारे कामगार आणि संघटनांच्यावतीने करण्यात आली.