संरक्षण खात्याचा निर्णय : अधिसूचना मागे
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ करण्यात आला. मात्र देशातील 57 कॅन्टोन्मेंटसाठी काढलेली अधिसूचना मागे घेऊन निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याचा आदेश संरक्षण खात्याने बजावला आहे. त्यामुळे देशातील सर्व
कॅन्टोन्मेंटची निवडणूक रद्द झाली आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी संरक्षण खात्याने 17 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली होती. देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीकरिता दि. 30 एप्रिलपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. महिला आरक्षण, वॉर्ड आरक्षण, मतदारयादी तयार करणे आदीसह उमेदवारी अर्ज वितरण करण्याची तारीख आणि मतदान व निकालाच्या तारखेची घोषणा केली होती. त्यानुसार मतदारयाद्या तयार करून शुक्रवार दि. 17 पासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ करण्यात आला होता. बेळगाव कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून अर्ज वितरणास प्रारंभ करण्यात आला. मात्र सदर निवडणुका रद्द करण्यात आल्याची घोषणा संरक्षण खात्याने केली आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना काही कारणास्तव मागे घेतली असल्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने शुक्रवारी दुपारपासून निवडणूक उमेदवारी अर्ज वितरणाचे काम बंद केले. तसेच ही निवडणूक संरक्षण खात्याने रद्द केल्याचे जाहीर केले आहे. देशातील 57 कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका रद्द केल्या असून काही कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मतदारयाद्या तयार नाहीत. तसेच काही कॅन्टोन्मेंटनी महिला आरक्षण जाहीर केले नाही. काही ठिकाणी निवडणुकीची तयारी करण्यात आली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डनी निवडणुकीची तयारी केली नसली तरी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ केला होता. पण संरक्षण खात्याच्या आदेशामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
इच्छुकांचा हिरमोड…
तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी इच्छुकांनी वॉर्डची चाचपणी करून तयारी चालविली होती. काहींनी अर्जदेखील घेतले आहेत. मात्र निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. चार वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांच्या अपेक्षेवर पुन्हा पाणी फेरले आहे. त्यामुळे संरक्षण खात्याचा पुढील आदेश आल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट राहणार आहे.