30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येतील; शर्यतीत 4 नावे पुढे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षपदासाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून सोमवारपासून इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील अशी शक्यता आहे. 1 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल आणि त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. काँग्रेसच्या एकापेक्षा जास्त नेत्यांनी अर्ज भरल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.
सद्यस्थितीत राजस्थानमधील ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गेहलोत यांच्याविरोधात केरळमधील नेते शशी थरुर यांच्याकडूनही अर्ज दाखल केला जाणार आहे. त्याचबरोबर आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या वाढली आहे. याआधी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावे समोर येत होती, मात्र आता माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारीही यात सामील झाले आहेत. तसेच कमलनाथ यांचेही नाव चर्चेत होते. दिग्विजय सिंह यांनीही मीडियाशी संवाद साधताना स्वतःला स्पर्धक असल्याचे सांगितले होते. पण ते शर्यतीत उतरणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. कमलनाथ यांच्याबाबतही अजून ठोस माहिती उघड झालेली नाही. 30 सप्टेंबरपर्यंत दिल्लीला जाण्याची त्यांची कोणतीही योजना नसल्याचा दावा सहकाऱयांनी केला आहे.