ज्ञानवापी संबंधी एएसआय अहवालावरून टिप्पणी
► वृत्तसंस्था/ लखनौ
वाराणसीतील ज्ञानवापीवरून अलिकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा (एएसआय) अहवाल समोर आला आहे. जीपीआर सर्वेक्षणानंतर एएसआयने ज्ञानवापीच्या ठिकाणी एक मोठे भव्य हिंदू मंदिर होते, असे म्हटले आहे. अहवालात संबंधित ठिकाणी मंदिर असल्याचे 32 हून अधिक पुरावे मिळाल्याचे नमूद आहे. आता याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या परंपरेवरून भारतीयांना गौरवाची अनुभूती व्हायला हवी. आमची परंपरा आणि संस्कृती प्राचीन आहे. आम्हाला इतिहासाच्या कक्षेत कुणीच कैद करू शकत नाही. आमचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. आताच 500 वर्षांनी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
ज्ञानवापीवरून एएसआयचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल सर्वांसमोर उदाहरण मांडणारा आहे. राम आमचे पूर्वज आहेत, कृष्ण आमचे पूर्वज आहेत. एएसआयनुसार ज्ञानवापीचा जो सध्या ढांचा आहे, त्याची पश्चिमेकडील भिंत पूर्वीच्या मोठ्या हिंदू मंदिराचा हिस्सा आहे. तसेच स्तंभावरील नक्षीकाम मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे योगींनी म्हटले आहे. हिंदू पक्षकारांनी केलेल्या युक्तिवादाला एएसआयच्या सर्वेक्षण अहवालामुळे एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.