पंजाब सरकार ठरले टीकेचे धनी
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबच्या अजनालामध्ये पोलीस स्थानकावरील खलिस्तान समर्थकांचा हल्ला आणि यानंतर राज्यातील आप सरकारने पत्करलेली शरणागती टीकेचा विषय ठरला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या पूर्ण प्रकरणी भगवंत मान सरकारला आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. कायदा-सुव्यवस्था हा केंद्राचा विषय नाही, जर पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्था सांभाळता येत नसल्यास भारत सरकारला ही जबाबदारी हाती घ्यावी लागणार असल्याचे कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये दररोज ड्रोन पकडले जात आहेत. केंद्र सरकारने आता याप्रकरणी हस्तक्षेप करावा असे माझे मत असल्याचे कॅप्टन अमरिंदर यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने खलिस्तानच्या मुद्दय़ावर कारवाई करण्याची गरज आहे. दुबईचा रहिवासी असलेला अमृतपाल हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआच्या इशाऱयावर पंजाबमध्ये पुन्हा खलिस्तानचे भूत उभे करू पाहत असल्याचा संशय आहे. अमृतपालचे कुटुंब दुबईत वास्तव्यास आहे. अमृतपालचा हेतू काय आहे याची चौकशी करण्यात यावी. कायदा-सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, परंतु भगवंत मान सरकार कुठलेच पाऊल उचलत नसल्याची टीका कॅप्टन अमरिंदर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.