1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून देणारे सर्वोत्तम कर्णधार
कोलकाता / वृत्तसंस्था
1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक चौथे स्थान संपादन करुन देणारे माजी कर्णधार समर ‘बद्रू’ बॅनर्जी यांचे शनिवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 92 वर्षांचे होते.
‘बद्रू दा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया समर बॅनर्जी यांना विस्मृती व उच्च रक्तदाबासह अनेक आजारांचा त्रास होता. दि. 27 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना एमआर बंगूर इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
‘बॅनर्जी यांची तब्येत ढासळल्यानंतर त्यांना तातडीने राज्य संचलित एसएसकेएम इस्पितळात दाखल करण्यात आले आणि राज्य क्रीडा मंत्री अरुप बिस्वास त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून होते. पण, मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी बॅनर्जी यांची प्राणज्योत मालवली’, असे मोहन बगान संघाचे सचिव देबाशिष दत्ता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.
भारतीय फुटबॉल संघाने आजवर 3 ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला असून बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले, ती संघाची ऑलिम्पिकमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यावेळी कांस्य पदकाच्या प्ले-ऑफ लढतीत भारताला बल्गेरियाविरुद्ध 0-3 अशा एकतर्फी फरकाला सामोरे जावे लागले होते. तो भारताचा फुटबॉलमधील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जात गेला.
1956 ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाल्यानंतर भारताने दुसऱया फेरीत ऑस्ट्रेलियाला 4-2 असे पराभूत केले. सईद अब्दुल रहीम यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघात पीके बॅनर्जी, नेव्हिले डिसोझा व जे कित्तू कृष्णस्वामी आदी अव्वल खेळाडूंचाही समावेश होता. मात्र, या संघाला युगोस्लाव्हियाविरुद्ध 1-4 फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर पुढे उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नव्हते.
मोहन बगानला पहिलेवहिले डय़ुरँड चषक (1953) व रोव्हर्स चषक (1955) जिंकून देण्याबरोबरच बॅनर्जी यांनी संतोष चषक स्पर्धेत दोनवेळा खेळाडू या नात्याने (1953, 1955) व एकदा प्रशिक्षक या नात्याने (1962) विजेतेपद मिळवून दिले. याशिवाय, भारतीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निधनाने भारतीय फुटबॉलमधील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. मागील 3 वर्षात पीके, चुनी गोस्वामी, सुभाष भौमिक व सुरजित सेनगुप्ता असे माजी खेळाडू देखील कालवश झाले.
बॅली प्रोटिव्हा क्लबमधून सुरुवात
बदू बॅनर्जी यांनी कलकत्ता फुटबॉल लीगमधील बॅली प्रोटिव्हा या थर्ड डीव्हिजन क्लबमधून फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर बीएनआर असे ओळखल्या जाणाऱया बंगाल नागपूर संघात त्यांना संधी मिळाली.
पुढे, मोहन बगानने त्यांना आठ वर्षांसाठी करारबद्ध केले. बॅनर्जी यांनी आपल्या पदार्पणाच्या वर्षातच राजस्थान क्लबविरुद्ध वादग्रस्त फायनलमध्ये मोहन बगानला आयएफए शील्ड मिळवून दिले. त्यानंतर पुढील हंगामात त्यांनी सेमीफायनल व फायनलमधील निर्णायक कामगिरीसह डय़ुरँड चषकावर देखील मोहोर उमटवून दिली. 1954 मध्ये सीएफएल व आयएफए शील्ड अशा दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून दिल्यानंतर त्यांना प्रशिक्षक रहीम यांनी भारतीय संघात स्थान दिले.
यादरम्यान, त्यांनी क्लबकडून ईस्ट आफ्रिका दौरा केला. 1958 मध्ये त्यांना मोहन बगानचे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र, तेथूनच संघाच्या कामगिरीला उतरती कळा लागल्याने ते कमनशिबी ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला सीएफएल, शील्ड व रोव्हर्स चषक स्पर्धेत उपजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
डॉक्टर व्हावे ही वडिलांची इच्छा होती, पण…
30 जानेवारी 1930 चा जन्म असलेल्या बद्रू बॅनर्जी यांची फुटबॉल कारकीर्द शालेय स्तरापासून सुरु झाली. त्यांचे वडील ससांका सेखर बॅनर्जी हे कडक शिस्तीचे होते आणि आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, ही त्यांची मनापासून इच्छा होती. बद्रू अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याने ते बऱयाचदा समाचार घेत असत. पण, यानंतरही बद्रू यांची पावले मोहन बगान, ईस्ट बंगाल, मोहमेडन स्पोर्टिंग संघांचा खेळ पाहण्यासाठी मैदानाकडे वळत असे. पुढे 18 वर्षांचे असताना बद्रू यांनी फुटबॉलवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कारकिर्दीची जडणघडण खऱया अर्थाने तेथून सुरु झाली होती.