जांबोटी-कणकुंबी रस्त्यावरील घटना
वार्ताहर /कणकुंबी
जांबोटी, कणकुंबी,चोर्ला रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडुपांमुळे बेटणे नजीकच्या एका धोकादायक वळणावर समोरून आलेली गाडी न दिसल्याने चारचाकी वाहनधारकांचा ताबा सुटून सरळ रस्त्याच्या दहा फूट अंतरावर दोन पलटी घेऊन गाडी खड्ड्यांमध्ये पडल्याची घटना गुरुवार दि. 5 रोजी दुपारी 4 वाजता घडली. बेळगाव, चोर्ला, गोवा या रस्त्याच्या दुतर्फा जांबोटी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी झुडुपे वाढलेली आहेत. सदर झुडपे गटारापासून ते रस्त्याच्या डांबरीकरणापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. त्यामुळे एखाद्या वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. वाढलेल्या झुडुपामुळेच या मार्गावरील अपघातांची संख्या वाढलेली असून वनखात्याला कधी जाग येणार, असा प्रश्न वाहनधारक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
विशेषत: वनखात्यामुळेच या मार्गाचा विकास थांबलेला असून कणकुंबी भागातील विविध गावच्या अॅप्रोच रस्त्यांचे प्रश्न रखडलेले आहेत. सद्यस्थितीत बेळगाव-चोर्ला-गोवा हा रस्ता दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमीच असते. परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी वाढलेल्या झुडुपांमुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. म्हणूनच अपघातांची संख्या वाढत आहे. गुरुवारी बेटणे जवळच्या वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्याने हा अपघात झाला आहे. यापुढे असेच अपघात होत राहिले तर वनखात्यावर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा कणकुंबी भागातील नागरिकांनी दिला आहे.