चारशे काजू झाडे भक्ष्यस्थानी : सुमारे दोन लाखांचे नुकसान :अग्निशामक दलाची चोख कामगिरी
वाळपई : भिंरोडा अडवई येथे काजू बागायतीला आग लागून मोठ्या प्रमाणात काजूची झाडे भक्ष्यस्थानी पडली आहेत यामध्ये सुमारे काजू बागायतदारांचे दोन लाख रुपये नुकसान झाले. पंचनाम्यात नुकसानीचा आकडा निश्चित समोर येणार आहे. भिंरोडा अडवई येथील मधुकर देसाई व घनश्याम देसाई यांच्या काजू बागायतींना अचानक आग लागली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. आगीचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येऊ शकली नाही. त्यामुळे वाळपई अग्निशामक दलाच्या पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या कामगिरीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तरीही सुमारे 400 पेक्षा जास्त काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये काजू बागायतदार घनश्याम देसाई व मधुकर देसाई यांनी मोठा फटका बसला आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आण्ण्यासाठी एका बंबाचा वापर करण्यात आला. दरम्यान, केल्या काही दिवसापासून काजू बागायतींना आग लागण्याचे प्रकार वाढू लागलेले आहेत. यामध्ये काजू उत्पादनाचे मोठे नुकसान होत आहे. आग नियंत्रणासाठी प्रत्येकाने आपल्या काजू बागायतीच्या सभोवताली उपाययोजना करून पुढील दोन महिने विशेष काळजी करण्याचे आवाहन अग्निशामक यंत्रणेने केले आहे.
सरकारने नुकसान भरपाई द्यावी!
उत्पादन देणाररी चार वर्षांची काजू कलमे होती. सर्व कलमे जळाल्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे. याची दखल घेऊन सरकारने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी घनश्याम देसाई यांनी केलेली आहे. दरम्यान स्थानिक सरपंच उदयसिंग राणे यांनी घनश्याम देसाई व मधुकर देसाई यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. अग्निशामक यंत्रणेच्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आग लागण्याचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र कुणीतरी आग लावली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही आग जणीवपूर्वक कुणी लावल्यास त्याचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच उदयसिंग राणे यांनी दिला आहे.