हैदराबाद
आंध्रप्रदेश सरकार 9 डिसेंबरपासून सर्वसमावेशक जातनिहाय जनगणना सुरू करणार आहे. माहिती आणि जनसंपर्क मंत्री सी. श्रीनिवास वेणुगोपाल कृष्णा यांनी जातीय जनगणनेबाबत शनिवारी मोठी माहिती दिली आहे. जात जनगणना पूर्ण करणे हे वायएसआरसीपी सरकारचे मुख्य लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी जातगणना करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात फक्त लोकसंख्येची जनगणना झाली आहे, जातीची जनगणना कधीच झाली नाही. राज्यात जात जनगणना निष्पक्ष आणि सर्वसमावेशक पद्धतीने केली जाईल, असे श्रीनिवास वेणुगोपाल पुढे म्हणाले.
आंध्रप्रदेशची ही जातीय जनगणना संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल. या मोहिमेमुळे विरोधी पक्ष हादरत असल्याचा दावा त्यांनी केला. सुऊवातीला 139 मागासवर्गीयांना समाविष्ट करण्यासाठी जात जनगणनेची घोषणा करण्यात आली होती, परंतु आता राज्यातील सर्व जातींचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.