कोल्हापूर-जागतिकीकरणाचा वेग ज्या पद्धतीने वाढत आहे, त्याच वेगाने आज जग बदलत आहे. ते पाहता यापुढे जातीसाठी कार्य करणाऱया संघटनांना यापुढे आर्थिक प्रश्नांवर लढावे लागणार आहे. त्यामुळे आरक्षण, जातीय अस्मितेत न अडकता या संघटनांनी आर्थिक विकासाचे पर्याय, मुद्दे पुढे आणावेत, त्यासाठी लढा सुरू करावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे. कोणत्याही प्रश्नांवर तातडीने प्रतिक्रिया देणे अथवा प्रतिक्रियावादी होणे देखील टाळावे, असेही ते म्हणाले.
कोंढरे मंगळवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे सात्वंन केल्यानंतर त्यांनी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाला भेट देवून तेथील कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मराठा महासंघाच्या पदाधिकाऱयांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना कोंढरे म्हणाले, आज ज्या पद्धतीने जग बदलत आहे. त्यातून रोजगार निर्मिती, रोजगारांच्या संधी यासह नव नवीन प्रश्न, समस्याही पुढे येत आहेत. या सर्व प्रश्नांना सर्वांचा सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी औद्योगिकरण, आयटी हबसह इतर रोजगार निर्मिती करणाऱया गोष्टींकडे गंभीरपणे पाहावे लागणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी तेथील स्थनिक स्थिती पाहून औद्योगिकरणासारख्या गोष्टींवर भर द्यावा लागेल. त्यातूनच युवा पिढीला रोजगार उपब्लध होणार आहे. त्यामुळे जातींसाठी कार्य करणाऱया संघटनांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आरक्षण आणि जातीय अस्मितेच्या मुद्दय़ांत न गुरफटता आर्थिक प्रश्नांसाठी लढावे, आग्रह धरण्याची गरज आहे. कोणत्याही प्रश्नावर तातडीने प्रतिक्रिया देण्याचे टाळून आर्थिक प्रश्नांचा विचार करावा. त्यातून व्यापक दृष्टीकोन विकसित होऊन समाजासमोरील समस्या कमी होण्यास मदत होईल. यावेळी अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.